लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव

सध्या महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सरकारनेही आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं ९० दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:34 AM • 01 Apr 2021

follow google news

सध्या महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सरकारनेही आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं ९० दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडून पडेल आणि रंगकर्मींची अवस्था वाईट होईल, या भितीपोटी रंगमंच कामगार,निर्माते आणि कलाकारांनी लॉकडाऊन करू नका अशी कळकळीची विनंती राज्य सरकारला केली आहे.

हे वाचलं का?

गेल्या वर्षी मार्च अखेरीस नाट्यगृहांना लागलेले टाळे जवळपास नऊ महिन्यांनी उघडले. या नऊ महिन्यांच्या काळात रंगमंच कामगार, कलाकार, निर्माते यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. त्यातून सावरत आता कुठे नाट्यक्षेत्र कार्यरत झाले. परंतु राज्यात करोना पुन्हा पाय पसरू लागल्याने सरकारने नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर नाट्य क्षेत्राचे गेल्यावर्षी झाले त्याहून दुप्पट नुकसान होईल, अशा भावना रंगकर्मींनी व्यक्त केल्या आहेत. ‘गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले. आज सर्व उपायांचे पालन करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असे संकट कोसळू नये,’ अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली. यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, निर्माते-दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, भारत जाधव, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री निर्मिती सावंत, प्रतीक्षा लोणकर, कविता मेढेकर आदी कलाकारांनी चित्रफित तयार करून उपाययोजनांची कठोरतेने अंमलबजावणी करा परंतु नाट्यगृह बंद करू नका असे’ असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

नाटकाचे प्रयोग सुरू होऊन आता कुठे ९० दिवस झाले आहेत. मराठी नाट्यनिर्मात्यांनी १ वर्ष नाटक बंद असल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन केलेलं आहे. काहीतर कर्जबाजारीही झाले आहेत. नाट्यगृह बंद झाल्यास आम्ही मोडून पडू अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.लोकांकडून प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन झाले नसल्याने ही अवस्था ओढवली आहे. परंतु त्याचा थेट उपजीविकेवर परिणाम होतो आहे हे लक्षात घ्यायला हवे. नाटक आजही पूर्णत: सावरलेले नाही. अशात पुन्हा त्यावर घाव बसला तर होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड देणे कठीण असेल. कलाकार, कामगारांनी सगळी जमापुंजी पणाला लावून मागील टाळेबंदीचा सामना केला. त्यामुळे आता सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये अशी कळकळीची विनंती अभिनेता आणि निर्माता भरत जाधव याने मुंबई तकशी बोलताना केली.

सध्या तरी सरकार लॉकडाऊनचा गंभीरतेने विचार करताना दिसत आहे. रंगकर्मींनी उध्दव ठाकरेंना लॉकडाऊन करू नका अशी कळकळीची विनंती आधीच केली आहे. परंतु तरीही कोरोनाचा प्रसार जास्त वाढत असेल आणि सरकाराला लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावाच लागला तर नाट्यक्षेत्राला आणि नाट्यगृहांना या लॉकडाऊनमधून वगळा ही मागणी करण्यासाठी आम्ही सगळे रंगकर्मी एकत्र येऊ आणि मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना लॉकडाऊन करू नका अशी मागणी करू असं अभिनेता आणि निर्माता भरत जाधवने मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केले.