Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant) गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:35 AM • 07 Apr 2022

follow google news

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant) गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्यांविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे वाचलं का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली आणि सोमय्यांविरोधात तक्रार देण्यात आली.

संजय राऊतांनी सोमय्यांवर आरोप केलेलं नेमकं प्रकरण काय?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांच्यावर गंभीर आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 57 ते 58 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, तो निधी राजभवनाकडे जमा केला गेलाच नाही, असं सांगत राऊतांनी सोमैय्यांच्या कंपनीत हा पैसा वापर गेलाय का? असा सवाल केला होता.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, ‘विक्रांत वाचवा म्हणून ते डबे फिरवायला लागले. त्या काळात त्यांना महाराष्ट्रातील लाखो करोडो लोकांनी पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले होते. ही रक्कम 57 ते 58 कोटी रुपये होती. मला हे त्यांच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं.’

‘महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. त्यांनी सरकारवर प्रचंड टीका करून, या सरकारमध्ये राष्ट्रीय भावना, देशभक्ती नाही, त्यामुळे आम्ही 200 कोटी रुपये गोळा करून ते राजभवनात जमा करू असं सांगितलं होतं’, असे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.

‘आता राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे पत्र आलं आहे. धीरेंद्र उपाध्याय नावाचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालांना याबद्दल विचारलं. 2013-14, 2014-2015 या काळात विक्रांतसाठी अशा पद्धतीने पैसे गोळा करण्यात आले होते. ते तुमच्याकडे जमा झाले आहेत का? राज्यपाल कार्यालयाचं पत्र आहे की, असा कोणताही निधी कार्यालयात जमा केला गेलेला नाही.’

‘सेव्ह विक्रांत’च्या नावावर गोळा केलेले ५७ कोटी कुठे गेले?; राऊतांचा सोमैय्यांवर गंभीर आरोप

‘देशाच्या सरंक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. 57 कोटी रुपये देशद्रोही किरीट सोमैय्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गोळा केले. 57 कोटी ही रक्कम लहान नाही. हा आकडा 100 कोटींच्या वर असावा. आता ते येतील आणि सांगतील माझा तर काही संबंध नाही. पैसे गोळे करतानाचे फोटो आहेत’, असं सांगत राऊतांनी आता सोमय्यांना कोंडीत पकडलं आहे.

‘राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे कुणाच्या घशात गेले, याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी करायलाच हवी. केंद्रीय तपास यंत्रणा जर निष्पक्ष असतील, तर सीबीआय, आयकर विभाग आणि भाजपची पदाधिकारी असलेल्या ईडीने चौकशी करून पाहावी. त्यांना चौकशीत काही सापडत नसेल, तर मी त्यांना मदत करेन,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

    follow whatsapp