राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत? मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार

मुंबई तक

• 07:13 AM • 21 Feb 2021

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विदर्भातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विदर्भातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करतात का अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान मुंबईत महापालिका प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी रात्री वांद्रे पश्चिम वॉर्डातील तीन रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. कोरोनाविषयक नियमांचं पालन होत आहे की नाही यासाठी महापालिकेच्या पथकाने धाड मारली असता वांद्रे पश्चिम भागातील ३ रेस्टॉरंटमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. ज्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पाली हिल येथील Irish House, खार येथील U Turn Sports Bar, Quarter Pillars Bar या रेस्टॉरंटना अनुक्रमे ३०, २० आणि ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.

कारवाई केलेल्या तिन्ही रेस्टॉरंटमध्ये १०० पेक्षा जास्त लोकं होती. याव्यतिरीक्त वांद्रे पश्चिम येथील एका बारवर धाड मारली असता १०० पेक्षा जास्त लोकं मास्कशिवाय वावरताना दिसली. ज्यानंतर या बारमालकाला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याव्यतिरीक्त G North वॉर्डातील माहिम येथील नियमांचं उल्लंघन करुन सुरु करण्यात आलेल्या अनधिकृत हॉटेलवरही पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.

याचसोबत पुण्यातही प्रशासनाने सावध पावलं उचलत शहरात रात्री ११ पासून आणि पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. याचसोबत पुण्यातील शाळा, कॉलेजंही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

    follow whatsapp