ठाकरे सरकारने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांची खरंच सुरक्षा काढली का?

मुंबई तक

• 06:46 AM • 25 Jun 2022

शिवसेनेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांची सुरक्षा सरकारने काढून घेतली असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सिद्धू मुसेवालाची हत्येचा संदर्भ देत संजय राऊत यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, […]

Mumbai Tak
Google CTA

शिवसेनेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांची सुरक्षा सरकारने काढून घेतली असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सिद्धू मुसेवालाची हत्येचा संदर्भ देत संजय राऊत यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि सर्व पोलीस आयुक्तांना हे पत्र देण्यात आलं आहे. या पत्रावर शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेल्या १६ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आमदार असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार आम्हाला घरी देण्यात सुरक्षा सुड भावनेनं बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. इतकंच नाही, तर माध्यमातून समोर आलेल्या रिपोर्टमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून कार्यकर्त्यांकरवी हिंसा घडवून आणण्याचाही आम्हाला धमकावण्याचा अजेंडा आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.

संजय राऊत यांच्याकडूनही धमकी दिली गेलीये, असंही या पत्रात म्हटलेलं आहे. सर्व आमदारांना सभागृहात येऊ द्या. जे आमदार सोडून गेलेत, त्यांना बघून घेऊ. परत आल्यानंतर आणि महाराष्ट्रात फिरताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागले, असं राऊत म्हणाले असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे.

राऊत यांच्या विधानामुळे आमच्या दोन सहकारी आमदारांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली आहे. आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर शिवसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.

याच पत्रात १६ बंडखोर आमदारांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचाही उल्लेख केला आहे. अलिकडेच पंजाबमध्ये सरकारने महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेतली. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गँगस्टरच्या रडारवर आल्या. तसाच परिणाम महाराष्ट्रातही होऊ शकतो, असं आमदारांचं म्हणणं आहे.

त्यामुळे प्रोटोकॉलनुसार तत्काळ आमच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी. जर आमच्या कुटुंबियांना काही इजा पोहोचली, तर याला मुख्यमंत्री, शरद पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते जबाबदार असतील, असं या आमदारांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री काय म्हणाले?

बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी हे पत्र ट्विट केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृह विभागाची भूमिका स्पष्ट केली आहे.

“राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृह विभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत,” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.