History : आजच्याच दिवशी सुरू झाला होता १८५७ चा उठाव, मंगल पांडे यांनी चालवली होती पहिली गोळी

मुंबई तक

28 Mar 2022 (अपडेटेड: 29 Mar 2023, 09:36 PM)

मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पहिली गोळी चालवली तो दिवस होता २९ मार्च १८५७. आज इतक्या वर्षांनीही तो संघर्ष आपल्याला लक्षात आहे. गायीची चरबी असलेलं काडतूस दाताने चावून काढण्यास मंगल पांडेने मनाई केली आणि त्याने ब्रिटिशांवर गोळी चालवली, १८५७ चा उठाव हा या एका घटनेने सुरू झाला. मंगल पांडे यांनी केलेली ही सुरूवात उठावाचं तात्कालिक […]

Mumbaitak
follow google news

मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पहिली गोळी चालवली तो दिवस होता २९ मार्च १८५७. आज इतक्या वर्षांनीही तो संघर्ष आपल्याला लक्षात आहे. गायीची चरबी असलेलं काडतूस दाताने चावून काढण्यास मंगल पांडेने मनाई केली आणि त्याने ब्रिटिशांवर गोळी चालवली, १८५७ चा उठाव हा या एका घटनेने सुरू झाला. मंगल पांडे यांनी केलेली ही सुरूवात उठावाचं तात्कालिक कारण ठरली. पुढे देशभरात इंग्रजांच्या विरोधात उठाव झाला.

हे वाचलं का?

२९ मार्च हा भारतीय इतिहासातला सर्वात मोठा दिवस मानला जातो. कारण १८५७ चा उठाव किंवा स्वातंत्र्यासाठीची पहिली चळवळ सुरू झाली ती आजच्याच दिवसापासून. १८५७ च्या सशस्त्र क्रांतीचे नायक होते मंगल पांडे. मंगल पांडे यांनी आपल्या आक्रमक स्वभावामुळे इतकी दहशत निर्माण केली होती की जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना फाशी देण्याचं ठरवलं त्या नियोजित दिवसाच्या दहा दिवस आधी त्यांना फासावर लटकवलं. मंगल पांडे यांना ८ एप्रिल १८५७ ला फाशी देण्यात आली. कुणालाही याची कुणकुण ब्रिटिशांनी लागू दिली नव्हती यातच हे दिसून येतं की मंगल पांडेंना ब्रिटिश किती घाबरत होते.

मंगल पांडे यांचा जन्म १९ जुलै १८२७ ला फैजाबाद येथील सुरूरपूरमध्ये झाला होता. १८४९ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मंगल पांडे ईस्ट इंडिया कंपनीच्या ३४ व्या बंगाल नेटिव्ह इन्फॅन्ट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या शिपायांसाठी इनफिल्ड रायफल आणण्यात आल्या. या नव्या रायफलच्या काडतुसांमध्ये गाय आणि डुक्कर यांची चरबी लावलेली असे. काडतूस वापरण्याआधी त्यावरची चरबी तोंडाने काढावी लागे. हिंदू शिपायांना गायीची चरबी असलेली काडतुसं आणि मुस्लिम शिपायांना डुकराची चरबी असलेली काडतुसं दिली जात. हिंदू धर्मात गाय पवित्र आणि मुस्लिम धर्मात डुक्कर निषिद्ध आहे हे इंग्रजांना ठाऊक होतं तरीही हेतुपुस्सर हे केलं जात असे. आपल्याच फौजेत असलेल्या शिपायांच्या धार्मिक भावनांशी इंग्रजांनी हा खेळ केला.

मंगल पांडे यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी याचा कडाडून विरोध केला. एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं. २९ मार्च १८५७ ला उठाव करत आणि इंग्रजांवर गोळी चालवत मंगल पांडे यांनी काडतूस वापरणार नाही असं सांगितलं. ज्यानंतर मंगल पांडे यांना ईस्ट इंडिया कंपनीने काढून टाकलं. यानंतर मंगल पांडे यांनी त्यांच्यासारखेच इतर शिपाई गोळा केले आणि ब्रिटिश अधिकारी हेअरसेयवर हल्ला केला. मारो फिरंगी को हा त्यांचा नारा तेव्हा देशभर गाजला होता.

या सगळ्या घटना घडल्यानंतर मंगल पांडे यांना इंग्रजांनी अटक केली. जेव्हा त्यांच्याविरोधात खटला भरला तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी चालवल्याची बाब मंगल पांडे यांनी मान्य केली. त्यानंतर कोर्टाने त्यांना १८ एप्रिल १८५७ ला फाशी देण्यात यावी असा फैसला दिला. मात्र इंग्रजांना ही भीती होती की जे मंगल पांडे यांनी केलं आहे ते जर संपूर्ण भारतात पसरलं तर आपल्याला देश सोडावा लागेल. त्यामुळे ८ एप्रिललाच मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. मात्र इंग्रजांना जे वाटत होतं ते प्रत्यक्षात उतरलं मंगल पांडे यांनी टाकलेल्या ठिणगीचा पुढे वणवा झाला. इंग्रजांविरोधात देशभरात उठाव झाला. भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा म्हणून या उठावाकडे पाहिलं जातं. फंदफितुरीमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे हा उठाव मोडून काढण्यात इंग्रजांना यश आलं. मात्र ठऱवलं तर भारतीय लोक काय करू शकतात याची चुणूक त्यांना या उठावातून दिसून आली.

    follow whatsapp