मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कार हे जातीत अडकता कामा नये-राज ठाकरे

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी संस्कार हे जातीत अडकता कामा नये. आपण मराठी आहोत हे खूप आहोत. जातीय अस्मितेच्या पलिकडे जाऊन मराठीचा विचार केला गेला पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण व्यवहारात मराठी ही महाराष्ट्रात सगळीकडे आढळते. पुणे, ठाणे, मुंबई या ठिकाणाहून अंदाज बांधता कामा नये. इतर […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 12:08 PM • 26 Feb 2022

follow google news

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी संस्कार हे जातीत अडकता कामा नये. आपण मराठी आहोत हे खूप आहोत. जातीय अस्मितेच्या पलिकडे जाऊन मराठीचा विचार केला गेला पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण व्यवहारात मराठी ही महाराष्ट्रात सगळीकडे आढळते. पुणे, ठाणे, मुंबई या ठिकाणाहून अंदाज बांधता कामा नये. इतर भाषांचा प्रभाव वाढतोय आपल्या राज्यात याबाबत दुमत नाही. पण मराठीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे असं नाही. प्रत्येक वेळी मराठीचा अभिमान बाळगण्यासाठी अपमानच झाला पाहिजे असं नाही.

हे वाचलं का?

राजकारण्यांनी संस्कार करायचा असतो. तो आपल्याकडे होत नाही. हा संस्कार जेव्हा होतो तेव्हा त्या गोष्टी टिकतात. आपल्याकडे ते होताना दिसत नाहीत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जींना भेटायला मी बंगालमध्ये गेलो होतो. लिफ्टमध्ये शिरल्यावर मला किशोर कुमारांची बंगाली गाणी सुरू झाली. हा असतो संस्कार. आपल्याकडे लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी यांची गाणी मंत्रालयात का वाजत नाहीत? तो संस्कार आपल्या राजकारण्यांनी करायला हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संवाद साधण्यासाठी भाषेचा अडसर येतो हा भ्रम आहे. आपल्याकडे लोक बोलतानाच सुरूवात हिंदीत करतात. मराठी बोलण्याची सुरूवातच करत नाहीत.मराठी हा आपला डीएनए आहे तो महाराष्ट्र विसरला आहे त्यामुळे मराठीचा सन्मान होत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठी साहित्याइतकं दर्जेदार साहित्य देशात कुठे नाही. तुम्ही तुमच्या भाषेत कडवट असाल ठाम असाल तर समोरचा माणूस तुमच्याशी जुळवून घेतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे ‘हिंदू हृदयसम्राट’ नाही, ‘मराठी हृदयसम्राट’च -मनसे

भाषा टिकवण्यासाठी मराठी बोलली जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असंही राज ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या लोकांनी पुष्पा सिनेमाही तेलुगू भाषेत आधी पाहिला. त्या सिनेमाला भाषेची गरज नाही हे उदाहरणही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी आपली परखड मतं मांडली आहेत. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपण मराठीसाठी कसं आग्रह धरला पाहिजे असं म्हटलं आहे.

आजही नरेंद्र मोदींना गुजरात आणि गुजराती भाषेला आस्था आहे. जर आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या राज्याबद्दल आणि आस्था वाटू शकते तर मग तशी ती आपल्याला का वाटत नाही? प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान हवा. राज्यातल्या प्रत्येक तरूण-तरूणीला ही आस्था वाटली पाहिजे तर भाषा मोठी होते. मराठी भाषेशी एकरूप होणं हे प्रत्येक मराठी माणसाने करणं आवश्यक आहे ती त्याची जबाबदारी आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp