लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात; पतीला जामीन देताना न्यायालयाची टिप्पणी

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात हे वाक्य आपण आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. परंतू मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान जस्टीस सारंग कोतवाल यांनी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पतीचा अर्ज मंजूर करत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात. पत्नीकडून हुंडा मागितल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका पतीच्या […]

Mumbai Tak

विद्या

• 02:20 PM • 30 Jan 2022

follow google news

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात हे वाक्य आपण आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. परंतू मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान जस्टीस सारंग कोतवाल यांनी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पतीचा अर्ज मंजूर करत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात.

हे वाचलं का?

पत्नीकडून हुंडा मागितल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका पतीच्या जामिन अर्जावर आज जस्टीस कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या प्रकरणात पती आणि पत्नीने एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं. “FIR पाहिली असता पती आणि पत्नी हे आता एकमेकांसोबत राहू शकत नाहीत असं दिसतंय. त्यांच्यात सारखी भांडणं होत आहेत. लग्नगाठ ही स्वर्गात नाही तर नरकात बांधली जाते”, असं मत जस्टीस कोतवाल यांनी नोंदवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये पत्नीने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१७ साली लग्नादरम्यान मुलाच्या घरच्यांनी आपल्या आई-वडिलांकडून प्रत्येक सदस्याला एक सोन्याचं नाणं मागितलं होतं. परंतू माझ्या घरचे ही मागणी पूर्ण करु शकले नाहीत त्यामुळे मुलाच्या घरच्यांनी माझा छळ करायला सुरुवात केली. आपल्या मुलासोबत वेगळं राहण्यासाठी आपण नवऱ्याला साडेतेरा लाख रुपये दिल्याचंही पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकच नव्हे तर पत्नी आपला छळ करते हे दाखवण्यासाठी पत्नी स्वतःला जखमा करुन घेतल्याचंही पत्नीने तक्रार अर्जात म्हटलं होतं.

दुसऱ्या बाजूने पतीने आपल्या पत्नीने केलेला दावा खोडून काढत नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी आपण ९ लाखांचं कर्ज काढल्याचं सांगितलं. लग्नानंतर हनिमूनला मॉरिशीअसला गेलो असताना आपण पत्नीला एक महागडा फोनही गिफ्ट दिल्याचं पतीचं म्हणणं आहे. पतीने कोर्टासमोर काही What’s App Chat चा पुरावा दाखवला, ज्यावरुन पत्नी आपला छळ करत असल्याचं पतीने सांगितलं. आपण याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर पत्नीने आपल्याविरुद्ध FIR दाखल केल्याचं पतीने कोर्टासमोर सांगितलं.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पतीला कस्टडीत घेऊन हा मुद्दा निकालात लागेल असं दिसत नाही असं मत नोंदवलं. या प्रकरणात कस्टडीत घेऊन चौकशीची गरज आहे असं वाटत नाही. पतीने तपास यंत्रणेशी सहकार्य करावं. दोघांचेही एकमेकांविरुद्ध आरोप आहेत, ते किती खरे आणि खोटे हे खटल्यादरम्यान ठरवता येतील असंही जस्टीस कोतवाल यांनी सांगितलं. यानंतर हायकोर्टाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर पतीचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला.

    follow whatsapp