राज्यमंत्री बच्च कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, २५ हजारांचा दंड

मुंबई तक

• 10:08 AM • 11 Feb 2022

– धनंजय साबळे, अमरावती राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूर बाजार न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फ्लॅटबद्दलची माहिती लपवल्याच्या प्रकरणात बच्च कडू यांना दोषी ठरवत चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निकाल दिला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी मुंबई येथे असलेल्या फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा […]

Mumbaitak
follow google news

– धनंजय साबळे, अमरावती

हे वाचलं का?

राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूर बाजार न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फ्लॅटबद्दलची माहिती लपवल्याच्या प्रकरणात बच्च कडू यांना दोषी ठरवत चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निकाल दिला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी मुंबई येथे असलेल्या फ्लॅटबद्दलची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा आरोप भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला होता. याप्रकरणात त्यांनी 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती.

बच्चू कडू यांच्या मालकीचा मुंबईत 42 लाख 46 हजार रुपये किंमती फ्लॅट आहे. मात्र, या फ्लॅटबद्दलची माहिती 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी चांदूर बाजार प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 25 हजाराचा दंडही ठोठावला आहे.

बच्चू कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या प्राधिकरणाकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. 19 एप्रिल 2011 रोजी बच्चू कडूंनी त्या फ्लॅटचा ताबा घेतला. 2014 च्या विधानसभा निवडणूक बच्चू कडूंनी लढवली. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील या मालमत्तेविषयीची माहिती निवडणूक आयोगाला दिलीच नाही.

यावर आक्षेप घेत तक्रारदार गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडूंवर आरोप केला होता. कडू यांच्याकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत त्यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच बच्चू कडूंविरोधात 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. न्यायालयाने बच्चू कडू यांना या प्रकरणात दोषी ठरवत दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

    follow whatsapp