महापौर किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराला धमकीचं पत्र, जिवे मारण्याची धमकी

मुस्तफा शेख

• 12:31 PM • 10 Dec 2021

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने-सामने आलेले पहायला मिळाले. हा वाद ताजा असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांना आज एक धमकीचं पत्र मिळालं आहे. पेडणेकर यांच्या वरळी येथील निवासस्थानावर हे पत्र आलं असून यात पेडणेकर यांच्या परिवारालाही धमकी देण्यात आल्याचं कळतंय. ज्यात अश्लील भाषेचा […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने-सामने आलेले पहायला मिळाले. हा वाद ताजा असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांना आज एक धमकीचं पत्र मिळालं आहे.

हे वाचलं का?

पेडणेकर यांच्या वरळी येथील निवासस्थानावर हे पत्र आलं असून यात पेडणेकर यांच्या परिवारालाही धमकी देण्यात आल्याचं कळतंय. ज्यात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला असून जर ‘दादा’सोबत वाकड्यात शिराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा उल्लेख आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांविरुद्ध FIR दाखल केल्यानंतर हे पत्र आल्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान या प्रकरणाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. “मला हे धमकीचं पत्र सकाळी मिळालं. मी नेहमी माझ्या प्रतिमेला सांभाळत आली आहे. परंतू आज आलेल्या पत्रात अश्लाघ्य भाषा वापरण्यात आलेली आहे की जे मी वाचूनही दाखवू शकत नाही. या पत्रात मला मारून टाकण्याविषयी उल्लेख आहे, इतकच नव्हे माझ्याबद्दलही अश्लिल शब्दांत लिहीण्यात आलेलं आहे”. हे बोलत असताना पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरांना आपले अश्रु अनावर झाले होते.

यावेळी बोलत असताना पेडणेकर यांनी राजकारणाचा स्तर घसरत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली. “मी राजकारणात आहे पण जर कोणी माझ्या परिवाराला हानी पोहचवत असेल तर मी शांत बसणार नाही. विजेंद्र म्हात्रे या नावाने हे धमकीचं पत्र मला मिळालं आहे.” जर राजकारणीच अशा प्रकारची वक्तव्य करणार असतील तर सामान्य लोकंही तेच करतील असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.

‘ठाकरे सरकारच्या मुस्कटदाबीला घाबरणार नाही!’ FIR रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांची हायकोर्टात धाव

काय होता आशिष शेलारांनी केलेला आरोप?

आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं.

वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.

    follow whatsapp