नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे निजामशाही आहे. राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महागाईचा प्रश्न विचारला की भारत-पाकिस्तान, महागाईचा प्रश्न विचारला की हिंदू-मुस्लिम प्रश्न असे प्रश्न बाहेर काढायचे. मात्र मूळ महागाई प्रश्नाला बगल द्यायची. महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. असा आरोप आज संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केला.
ADVERTISEMENT
भाजपचे नेते उठसुट तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात, तुरुंगाचे खासगीकरण झालं आहे का?-संजय राऊत
त्रिपुरात काहीतरी घडलं तर त्यामुळे इथे दंगल पेटवली जाते आहे. या दंगलीमागे महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. मी भाजपला इशारा देतो आहे आम्हाला हात लावाल तर तुमचे हात पोळतील. महाराष्ट्राला आग लावायची आणि आणि राज्य करता येत नाही अशी बोंब मारायची असाही आरोप संजय राऊत यांनी औरंगाबादच्या आक्रोश मोर्चात केला आहे.
भाजपने कितीही कारस्थानं करूदेत तुमच्या कारस्थानाच्या छाताडावर आम्ही राज्य करू असाही इशारा आज संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना हा तळपता सूर्य आणि आग आहे. हे कुणीही विसरू नये बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावर विशेष प्रेम होतं इथूनच आपण क्रांती मोर्चाला सुरूवात केली आहे असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्ला चढवला. थाळ्या बडवून कोरोना जात नाही आणि महागाई हटत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवरही टीकेचे बाण चालवले.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसनेचे असूनही आंदोलन का करताय, असा प्रश्न विचारला जातोय, त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यात सत्तेत असूनही सरकारला काम करू द्यायचे नाही, अशी कारस्थानं चालवली जात आहेत. रोज महाविकास आघाडीच्या दारात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची यंत्रणा आणून उभी करायची, सरकारची नाकेबंदी करायची, अशी कारस्थानं केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हलवण्यासाठी सुरु आहेत. याद्वारे मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचं काम सुरु आहे, म्हणून आम्ही आंदोलन करतोय, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
भाषणात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून आम्ही या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
महागाईवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या दोन वर्षात सुमारे 17 हजार लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट आणि महागाईच्या कारणामुळे आत्महत्या केली. मात्र केंद्र सरकारला याची चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचे विमान खरेदी केले.. त्यामुळे अशा सरकारचं करायचं काय असा प्रश्न पडला आहे, असेही ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी 75 पैशांना असलेला साधा माचिस बॉक्सही 2 रुपयांना झाल्याचं त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं.
ADVERTISEMENT
