नवाब मलिक काल म्हणालेले, ‘कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध..’, अन् आज ED ची कारवाई

मुंबई तक

• 08:08 AM • 23 Feb 2022

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं असून त्यांची गेल्या अनेक तासापासून चौकशी सुरु आहे. अशातच आता नवाब मलिक यांच्या कालच्या वक्तव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. नवाब मलिक यांनी काल एक वक्तव्य केलं होतं ज्याची दिवसभर चर्चा रंगली होती. पण त्यानंतर आज पहाटेच नवाब मलिक यांच्या घरी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं असून त्यांची गेल्या अनेक तासापासून चौकशी सुरु आहे. अशातच आता नवाब मलिक यांच्या कालच्या वक्तव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. नवाब मलिक यांनी काल एक वक्तव्य केलं होतं ज्याची दिवसभर चर्चा रंगली होती. पण त्यानंतर आज पहाटेच नवाब मलिक यांच्या घरी ईडीची धाड पडली.

हे वाचलं का?

जाणून घ्या नवाब मलिक काल म्हणाले होते:

‘एखादी महिला मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या नावाने आरोप करत आहात. मला वाटतं ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण जे भाजपच्या लोकांच्या माध्यमातून सुरु आहे निश्चित रुपाने जर काही वाईट घडलं तर ती जबाबदारी भाजपच्या लोकांचीच असेल.’

‘आता दिशाची हत्या झाली असं राणे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय सांगतायेत. पण त्यांना जे अनुभव आहेत त्याबाबत ते बोलत आहेत. सिनेमा जगतातील लोकांचे कोणाचे कोणाशी संबध आहेत हे माहिती आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला तोंड उघडण्यासाठी जास्त आव्हान देऊ नये.’

‘नाही तर कोणती अभिनेत्री कोणाबरोबर… कोणाचे काय सबंध आहेत याची एक यादीच आहे. लोकांच्या समोर आल्यानंतर भाजपवाल्यांना त्याचं उत्तर देता येणार नाही.’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं.

नवाब मलिकांना ईडीचं बोलावणं

दरम्यान, नवाब मलिक यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्याला 24 तासही उलगडत नाही तोच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पहाटेच धडकली. त्यानंतर त्यांना सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईडी कार्यालयात नेण्यात आलं. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.

ईडी कार्यालयात जबाब नोंदवला जात असताना पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नवाब मलिक यांनी सरदार खान या व्यक्तीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या ३० लाखांत खरेदी केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याआधी मलिकांवर हा आरोप केला होता.

सरदार खान हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक असून त्याचा 1993 च्या मुंबई सिरीअल बॉम्ब ब्लास्टमध्येही सहभाग होता.

सरदार खान सध्या औरंगाबाद जेलमध्ये कैदेत असून दाऊदची बहीण हसीना पारकरच्या एका व्यक्तीने नवाब मलिक यांना या जागेच्या व्यवहारात मदत केल्याचं कळतंय. मलिकांच्या याच व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ईडी काय पावलं उचलते आणि नवाब मलिक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोणत्या अभिनेत्रीचे कोणासोबत संबंध हे उघड करायला लावू नका, नाहीतर भाजपवाल्यांना… : नवाब मलिक

देवेंद्र फडणवीसांनी काय केले होते आरोप?

मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. सरदार खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस म्हणाले होते.

    follow whatsapp