रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात गुरुवारी भीषण अपघात झाला. सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबाची गाडी तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २ महिन्यांच्या चिमुकल्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
अपघातात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटातील गायमुखजवळ हा अपघात झाला.
रस्त्याचा अंदाज न आल्याने आणि कठडा नसल्यामुळे किया सँल्टोस (KA32-Z0949) गाडी खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचप्रमाणे साखरपा व आंबा येथील स्थानिक तरुण मदतीसाठी धावून गेले.
खोल दरी व जंगल असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र अडथळ्यांवर मात करून खोल दरीत गाडी कोसळलेल्या ठिकाणी तरुण पोहचले. शिवांश हरकुडे (२ महिने), सृष्टी संतोष हरकुडे (३२) यांचा जागीच मृत्यू झालेला होता. यावेळी २ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.
या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुळारे, तन्मिना हरकुडे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आंबा घाटातील स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना १०८ ॲम्बुलन्स, नरेंद्र महाराज संस्थान ॲम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं.
देवदर्शनासाठी निघालं होतं कुटुंब
अपघातग्रस्त झालेलं कुटुंब सांगली विश्राम बाग येथील होते. देवदर्शनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडला असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.
याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी स्विफ्ट गाडीचा अपघात घडला होता. यामध्ये एका वृद्धाला यात जीव गमवावा लागला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा येथे जखमींना उपचारासाठी नेण्यात आलं होतं. घटनेचा तपास साखरपा पोलीस स्थानक कर्मचारी करीत आहेत.
ADVERTISEMENT