विश्वास, विकास आणि जनसहभागाचं एक तप!

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या बारा वर्षात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लेखातून घेत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

twelve years of transformation trust development and indias rise a special article by cm devendra fadnavis marking completion of 12 years of narendra modi tenure as prime minister

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो)

जेव्हा 12 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा आपण त्याला सामान्यतः 'तप' म्हणतो. 'तप' या शब्दात संघर्ष, अथक प्रयत्न आणि ध्येय साध्य करण्याचा दृढनिश्चय सामावलेला असतो. त्यामुळे, जेव्हा आपण म्हणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने एक तप पूर्ण केलं आहे, तेव्हा या कालावधीचे मूल्यांकन याच निकषांवर केले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून, हा काळ सेवा, समर्पण आणि सुशासनाचा सुवर्णकाळ ठरला आहे.

हे वाचलं का?

तपस्येचे दोन पैलू आहेत. जर ही तपश्चर्या समाजासाठी असेल, तर समाजालाच त्याचे फायदे मिळतात आणि समाजातील अनेक घटकांना त्याचा लाभ होतो. मोदींच्या तपश्चर्येचा परिणाम भारतातील सामान्य नागरिकांच्या जीवनातील अभूतपूर्व क्रांतीच्या रूपात दिसून येतो. 2014 ते 2026 पर्यंतचा त्यांचा 12 वर्षांचा प्रवास एका परिवर्तनशील युगाचा साक्षीदार आहे. ही केवळ सत्तेची 12 वर्षे नाहीत, तर विश्वास, विकास, सुशासन, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि लोककल्याण यांचा एक अनोखा संगम आहे.

आज आणखी एक विशेष प्रसंग आहे. मोदींनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला. काही जणांच्या मते नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. जेव्हा नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा भारतीय समाजात असा विश्वास होता की त्यांना पर्याय नाही. मात्र, मोदी पंतप्रधान होईपर्यंत जनता अधिक लोकशाहीवादी झाली होती. त्यांना मतदानाचा हक्क आणि त्याचे महत्त्व समजले होते. लोकांना त्यांच्या आशा-आकांक्षांची स्पष्ट जाणीव झाली होती. सरकार लोकांच्या कल्याणासाठी असते, हेही त्यांना माहीत होते. याच टप्प्यावर मोदींचे सरकार सत्तेवर आले. 2014 मध्ये जनतेने प्रचंड पाठिंब्याने त्यांना असे आव्हान दिले की, जे काँग्रेस पक्ष 50-60 वर्षांत पूर्ण करू शकला नव्हता. हे आव्हान स्वीकारून मोदींनी 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र दिला, ज्याचा नंतर 'सबका विश्वास, सबका प्रयास' असा विस्तार झाला. 2014, 2019 आणि 2024 च्या विजयी टप्प्यांनंतर, ते आता भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करत आहेत.

2014 आणि 2019 च्या स्पष्ट जनादेशानंतर, 2024 मधील विजय हे केवळ एक निवडणुकीतील यश नव्हतं, तर विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वावरील जनतेचा नव्याने निर्माण झालेला विश्वास होता. नरेंद्र मोदी हे 1962 नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे देशाचे पहिले नेते ठरले. जेव्हा जगभरातील अनेक लोकशाही देश राजकीय अस्थिरतेशी झुंजत होते, तेव्हा भारताने स्थिरता, सातत्य आणि निर्णायक नेतृत्वाचा मार्ग निवडला. गेल्या दशकात, भारताने आर्थिक सुधारणा, सामाजिक परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रभावी परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून स्वतःला एक अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्थापित केले आहे. जगभरातील 24 हून अधिक देशांनी त्यांना प्रदान केलेले सर्वोच्च सन्मान याची पुष्टी करतं.

हा केवळ एका नेत्याचा प्रवास नव्हता, तर त्यात भारतातील जनतेने सहभाग घेतला होता. परिणामी, भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलरवरून 4.18 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढली, ज्यामुळे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक समृद्धी आवश्यक आहे. मोदींना हे केवळ समजलेच नाही, तर त्यांनी प्रत्येक स्तरावर ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही केले. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' यांसारख्या मोहिमांनी भारतीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे आणि भारतीय उत्पादनांवरील जागतिक विश्वास वाढवला आहे. आज, स्वदेशी संरक्षण उपकरणांची मागणी इतकी वाढली आहे की, पुढील दहा वर्षांचे उत्पादनही कमी पडू शकते. हीच आत्मनिर्भर भारताची खरी ताकद आहे.

देशातील 12 राज्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव कमी करणे ही मोदी सरकारची एक ऐतिहासिक कामगिरी आहे. जी क्षेत्रे अनेक दशकांपासून विकासापासून वंचित होती, तिथे आता विकासाचा प्रवाह वाहत आहे. जवळपास 20 कोटी लोक भीती आणि गरिबीत जगत होते. नक्षलवादाने विकास थांबवला होता आणि हजारो तरुणांच्या जीवनावर परिणाम केला होता. आज परिस्थिती बदलत आहे. गडचिरोलीसारख्या भागांमध्ये पोलाद उद्योग उभारले जात आहेत, तसेच विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन केल्या जात आहेत. बंदुकीच्या आवाजावर विकासाच्या हाकेने विजय मिळवला आहे.

गेल्या 12 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांच्या विकासात अभूतपूर्व प्रगती केली आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 91,000 किलोमीटरवरून सुमारे 1,46,000 किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. दररोज सरासरी 34 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम होत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लाखो किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम झाले असून, त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले आहे. रेल्वे क्षेत्रात ब्रॉडगेज विद्युतीकरण वेगाने प्रगती करत आहे. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत स्टेशन योजना आणि आधुनिक रेल्वे स्थानकांनी भारतीय रेल्वेला एक नवी ओळख दिली आहे. मेट्रोचे जाळे 248 किलोमीटरवरून 1095 किलोमीटरहून अधिक विस्तारले आहे.

मोदी सरकारने 'अन्नदाता' शेतकऱ्याला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात आली. तिसऱ्या कार्यकाळातील पहिली फाईलसुद्धा शेतकरी कल्याणाशी संबंधित होती, ज्यातून सरकारचे प्राधान्य स्पष्टपणे दिसून येते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 'थेंबा थेंबाने अधिक पीक' या मोहिमेमुळे लाखो हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणली गेली. कृषी उत्पादनात विक्रमी वाढ झाली आणि भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 81 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली. उज्ज्वला योजनेअंतर्गत 11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळाली. जल जीवन मिशनच्या माध्यमातून 16 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यात आले.

मोदी सरकारच्या धोरणांमध्ये महिलांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जन-धन खात्यांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. 'लखपती दीदी' अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व लाभ, बचत गटांचे सक्षमीकरण आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांचा वाढता सहभाग यांमुळे महिला-नेतृत्व विकासाची संकल्पना साकार झाली आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने डिजिटल क्रांतीचा नवा इतिहास रचला आहे. जन-धन, आधार आणि मोबाइलच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. भारताने UPI व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व प्राप्त केले आहे. भारतनेट प्रकल्पांतर्गत लाखो ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आले आहे. डिजिटल प्रशासन, फेसलेस करप्रणाली आणि GeM पोर्टलने प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवले आहे.

भारत आता जगाशी समान पातळीवर संवाद साधतो. भारत व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान मिळवू इच्छितो, पण आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही भारताने आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले आणि जागतिक दबावाला बळी न पडता स्वतंत्र धोरणे राबवण्याची आपली क्षमता दाखवून दिली.

आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' आणि 'पीएलआय' योजनांनी उत्पादन क्षेत्राला नवी चालना दिली आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश बनला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी मोठी गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत आणि भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. स्टार्टअप संस्कृतीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि शेकडो युनिकॉर्न कंपन्यांची वाढ झाली आहे.

मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात भारताने अभिमानाने आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा स्थापित केली आहे. अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक आणि केदारनाथ पुनर्विकास यांसारख्या प्रकल्पांनी राष्ट्राच्या आध्यात्मिक चेतनेला पुनरुज्जीवित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या मोदींनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पंचतीर्थ, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा आदिवासी अभिमान दिन, सरदार पटेलांना समर्पित 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित 'कर्तव्यपथ' आणि नवीन संसद भवन यांसारखी राष्ट्रीय अभिमानाची प्रतीके स्थापित केली.

या विकास प्रवासाचा सर्वात मोठा लाभार्थी महाराष्ट्र आहे. मोदींनी महाराष्ट्राच्या प्रत्येक गरजेला आणि आव्हानाला सामोरे जाण्यासाठी योगदान दिले आहे. इंदू मिल स्मारकासाठी जमीन उपलब्ध करून देण्यापासून ते अमरावती टेक्सटाईल पार्क, वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांपर्यंत, प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला त्यांचा पाठिंबा मिळाला.

आज जग भारताकडे केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे, तर जागतिक समस्यांवर उपाय देणारा एक विश्वासार्ह आणि जबाबदार देश म्हणून पाहते. आज भारत जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने उभा आहे. या 12 वर्षांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयासाठी एक भक्कम पाया घातला आहे. आपल्या देशवासियांचा ठाम विश्वास आहे की विश्वास, विकास आणि लोकसहभागाचा हा प्रवास येत्या काळात आणखी वेगाने पुढे जाईल.