ADVERTISEMENT
CJP Protest : पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून दिल्लीतील जंतरमंतरपासून सुरु झालेले आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मागे घेण्यात आलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. नेहमीच्या राजकीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन मध्यमवर्गीय आणि युवा विद्यार्थ्यांनी उभारलेल्या या आंदोलनाला भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांतील नेत्यांच्या मुलींनीच पाठिंबा दर्शवला आहे. स्वतःच्याच घरातील तरुणाईने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि सोशल मीडियावरून केलेल्या थेट प्रश्नांमुळे सरकार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर एकप्रकारे 'रियालिटी चेक' देण्याची वेळ आली आहे.
दिविजा फडणवीस काय म्हणाल्या?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर भाष्य करताना, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. आंदोलक आणि पोलीस या दोघांकडूनही होणाऱ्या हिंसेचे समर्थन करता येणार नाही, असे सांगत त्यांनी शैक्षणिक सुधारणांचे समर्थन करताना राजकीय पक्षाचे आंधळेपणाने समर्थन करू नका असा सल्लाही दिला. दुसरीकडे, आसाम गण परिषदेचे नेते आणि मंत्री केशव महंता यांची मुलगी दिबिसा हिने गुहाटीमध्ये थेट रस्त्यावर उतरून पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात निदर्शने केली.
हे ही वाचा : धर्मेंद्र प्रधान यांचं संसदेत जंगी स्वागत, भाजप विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय?
कुटुंबापेक्षा वेगळी भूमिका
ओडिशातील भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता सारंगी हिने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थ्यांच्या बाजूने पोस्ट शेअर करत कुटुंबाच्या राजकीय भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. तसेच उत्तर प्रदेशातील माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनीराजे सिंह हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. 'जेन-जी' (Gen-Z) पिढीतील या मुलींनी आपल्या पालकांच्या राजकीय विचारांपेक्षा वेगळे जात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे या घटनांवरून दिसून आले.
हे ही वाचा : बदलापूर : अय्यंगार बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा, दोन मुलींसह नगरसेविका आजारी
'स्वतंत्र विचार असू शकतात'
आपल्याच मुलांनी घेतलेल्या या भूमिकेवर नेत्यांना मात्र बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या मतांशी पालकांना जोडणे योग्य नसल्याचे सांगत, प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र विचार असू शकतात असे स्पष्ट केले. तर खासदार अपराजिता सारंगी यांनी आपल्या मुलीने नकळत ती पोस्ट टाकली होती आणि चूक लक्षात आल्यावर ती डिलीट केली, असे स्पष्टीकरण दिले. नेते आणि मंत्र्यांची मुलेच सरकारविरोधात ठामपणे उभी राहिल्याने या आंदोलनाला एक वेगळे राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे.
ADVERTISEMENT












