मुंबई: माजी खासदार निलेश राणेंनी आमदार आदित्य ठाकरेंविरोधात अश्लाघ्य भाषेत ट्विट करत टीका केली आहे, त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. राणे पिता-पुत्र विरुद्ध ठाकरे वाद काही नवा नाही, याअगोदरही अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली आहे, त्यामध्ये आता राणे बंधूंनी पुन्हा भर टाकली आहे.
ADVERTISEMENT
निलेश राणे, नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?
निलेश राणेंनी ट्विटरवरती आदित्य ठाकरे आणि राहुल कनाल यांचा एक फोटो शेअर केला आहे, त्यात त्यांनी म्हटलंय ”सून मिळत नाही म्हणून जावई शोधला की काय?” तर दुसरीकडे आमदार नितेश राणेंनी दसरा मेळाव्यावरील हायकोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ”फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ?? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले !!”
आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबद्दल रामदास कदम काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरेंनी बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी दापोलीमध्ये शिव संवाद यात्रा घेतली यामध्ये त्यांनी रामदास कदम, आमदार योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीनं सभा घेण्यात आली त्यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लग्नाच्या मुद्द्यावरुन डिवचलं होतं. ”नुसती दाढी वाढवून फायदा काय? आधी लग्न करून बघ” असं आधी शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले होते. आता त्याचीच पुढची री राणे बंधूंनी ओढली आहे.
आदित्य ठाकरेंना म्यांव-म्यांव आवाज काढून हिणवलं होतं
आदित्य ठाकरेंना म्यांव-म्यांव असे आवाज काढून विधिमंडळ परिसरात नितेश राणेंनी डिवचलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी त्यांना भर विधानसभेत समज दिली होती. मात्र तरीही ठाकरेंवर टीका करण्याची ते ही खालच्या भाषेत, एकही संधी राणेंकडून सुटत नाही. केवळ राणे बंधूच नाही तर नारायण राणेंकडूनही हल्ली उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, अर्वाच्च आणि दमदाटीची भाषा असते. आता राणे बंधूंनी आदित्य ठाकरेंवरती केलेली टीकाच नाही, तर हा समलैंगिक समुदायाला कमी लेखण्याचा प्रकार आहे.
ADVERTISEMENT