ओमिक्रॉन व्हेरिएंच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण कायम ठेवलं जाईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून, रिझर्व्ह बँकेने पतधोरण कायम ठेवलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केलं. आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवले असून, ‘ईएमआय’धारकांना कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही.
ADVERTISEMENT
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची (मॉनेटरी पॉलिसी) बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केलं. मागील दोन वर्षांपासून अर्थव्यवस्था कोविड संकटातून जात असून, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवण्यात आले होते. आजही दोन्ही कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ईएमआयमध्ये कोणतीही कपात वा वाढ झालेली नाही. रेपो रेट 4 टक्केच ठेवण्यात आला, तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम आहे.
मॉनेटरी पॉलिसीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी पॉलिसी रेट अर्थात रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवण्याला पाठिंबा दिला. त्याचबरोबर मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटीही 4.25 टक्केच कायम ठेवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकार तयार असल्याचं शक्तिकांता दास यांनी सांगितलं.
जीडीपी वाढीचा दर किती असणार?
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विकासदर 9.5 टक्के राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील विकासदर 6.8 टक्क्यांवरून कमी करून 6.6 टक्के इतका कमी केला आहे. तर चौथ्या तिमाहीतही विकासदर 6.1 टक्क्यांवरून कमी करत 6 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर 2022 वर्षात घाऊक महागाईचा दर 5.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महागाईदर रिझर्व्ह बँकेने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच आहे. यंदा रब्बीमध्ये पिकं चांगली असल्यानं पुढील काळात भाव कमी होतील. पालेभाज्याचे दरही कमी होतील. त्याचबरोबर या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाई उच्चांकावर असेल, पण त्यानंतर त्यात घट होत जाईल, असं गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT