Sanjay Raut : प्रधान सचिवांना राऊतांचं पत्र, हक्कभंग प्रकरणावर म्हणाले…

मुंबई तक

08 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:53 PM)

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीस प्रकरणावर अखेर उत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलं असून, त्यात त्यांनी वेळेत खुलासा न करू शकल्याचं कारणही सांगितलं आहे. त्याचबरोबर राऊतांनी आणखी वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ असं म्हटलं होतं. यावर आक्षेप […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीस प्रकरणावर अखेर उत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलं असून, त्यात त्यांनी वेळेत खुलासा न करू शकल्याचं कारणही सांगितलं आहे. त्याचबरोबर राऊतांनी आणखी वेळ मागितला आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ असं म्हटलं होतं. यावर आक्षेप घेत भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी हक्कभंग सूचना मांडली होती. यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली होती. यावर आता संजय राऊतांकडून उत्तर दिलं गेलं आहे.

संजय राऊत यांनी खुलासा करण्यासाठी मागितली वेळ

संजय राऊत पत्रात म्हणतात, “कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली.”

“मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दिनांक 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावली”, असं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं आहे.

खासदारांचा विशेषाधिकार संजय राऊतांची अटक टाळणार?, हक्कभंग म्हणजे काय?

“महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळाचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून, माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. कृपया लक्षात घ्यावे”, असं सांगताना राऊतांनी अखेरीस म्हटलं आहे की, “तरीही या प्रकरणावर सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं होतं.

    follow whatsapp