Sher Shivraj : अफझल खानाचा फसलेला डाव आणि शिवरायांच्या पराक्रमाची यशस्वी गाथा

मुंबई तक

• 01:28 PM • 21 Apr 2022

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सगळं आजही आपल्या डोळ्यासमोर आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसी पराक्रमाने आपले रोमांच जागे होतात. त्यांची ही अजरामर कथा जेव्हा सिनेमा स्वरूपात आपण याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा कृत्यकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि हिच […]

Mumbaitak
follow google news

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सगळं आजही आपल्या डोळ्यासमोर आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसी पराक्रमाने आपले रोमांच जागे होतात. त्यांची ही अजरामर कथा जेव्हा सिनेमा स्वरूपात आपण याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा कृत्यकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि हिच दिग्पाल लांजेकरच्या शेर शिवराज सिनेमाची खासियत आहे जी आपल्याला सेकंदा सेकंदाला खिळवून ठेवते.

हे वाचलं का?

किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळते.

आजवर शिवचरित्र अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो.

त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता.

प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या सिनेमात आपल्याला घडतं. त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पालनं केलं आहे. आणि त्यामुळेच क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सिनेमा आपल्याला आवडू लागतो. आणि याचं संपूर्ण श्रेय लेखक,दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरला जातं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला अभिनेता चिन्मय मांडेलकर, जिजाऊंच्या भूमिकेतील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, बर्हिजी नाईकांच्या भूमिकेत स्वत दिग्पाल लांजेकर आणि इतर सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय चोख केल्या आहेत..

अफझलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषीने कमाल केली आहे… अतिशय समर्थपणे मुकेश ऋषींनी ही भूमिका वठवली आहे. अफझलखानाच्या वधाच्या सीनला बँकग्राऊंडला वाजणारं गाणं आणि तो एेतिहासिक प्रसंग अतिशय वाखाण्याजोगा झालाय..

प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन या सगळ्या घटना,गोष्टी आपल्याला प्रेरित करतात.. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या या शौर्याच्या गाथेला जवळच्या सिनेमागृहात जाऊन पाहायालच हवं.

    follow whatsapp