‘लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार’; देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान

मुंबई तक

07 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. तुम्ही विचार करत आहात, त्याआधी विस्तार करू.”

सुनावणी घेण्याचे अधिकार सचिवांना दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माहिती असतानाही जेव्हा राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते, त्यावेळी असं सांगितलं जातं. हे अधिकार अर्धन्यायिक प्रकरणाच्या सुनावणी दिले गेले आहेत.”

“गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्यापूर्वीच्या आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना ते अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही, देशात परंपरा आहे. अर्धन्यायिक प्रकरणाचे सुनावणीचे अधिकार सचिवांना दिले जातात. बाकी कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरकार जनतेचं आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहे. जनतेचे लोकच मंत्रिमंडळाचे निर्णय घेतील.”

शिंदे गटातील काही आमदार म्हणताहेत की, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, असा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “कोण काय म्हणतंय याला राजकारणात महत्त्व नसतं. परिस्थिती काय आहे, याला राजकारणात महत्त्व असतं. त्यामुळे हा काय बोलला. तो काय बोलला, यावर उत्तर देण्याइतका रिकामटेकडा मी नाहीये.”

लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार – देवेंद्र फडणवीस

भाजपने राज्यातील काही लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहेत. यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.

“श्रीकांत शिंदेंसह भाजपसोबत आलेल्या शिवसेना खासदारांना जिंकून आणणार”

भाजपच्या या रणनीतीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. हे खरं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भाजपने १६ मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलेलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघही त्यामध्ये होता.”

“पुढची लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार आहोत, त्यामुळे आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा पक्ष जरी मजबूत केला, तरी ती सारी शक्ती शिवसेनेचे जे खासदार आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठीच खर्ची घालणार आहोत”, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे

“16 मतदारसंघांमध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांत बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. आम्ही चांगली लढत त्या मतदारसंघात दिली आहे. त्यामुळे तो मतदारसंघ १६ मतदारसंघात आहे. १६ मतदारसंघासाठी केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय नेत्यांकडे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. निर्मला सीतारामन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये येतील”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“ओबीसी आरक्षण मिळालेलंच आहेत. जे आदेश आलेले आहेत. त्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना निघालेली नाही, अशा सर्वांना ओबीसी आरक्षण लागू केलं. त्या आकड्यात अधिसूचना न निघालेल्या ९२ नगरपालिकाही टाकण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात आम्ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहोत. ९२ नगरपालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी आरक्षण लागू आहे आणि सदस्यपदासाठी नाही, असा गोंधळ आहे. त्यात सुधारणा करून देण्याची मागणी आम्ही केली आहे”, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp