‘न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण…’; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

21 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राजकीय वर्तुळात तसेच न्यायालयात सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात लढाई लढताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणीवर आज उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “आज ही एवढी गर्दी आहे. दसऱ्याला किती असेल, किती पटीने असेल. दसरा […]

Mumbaitak
follow google news

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राजकीय वर्तुळात तसेच न्यायालयात सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात लढाई लढताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणीवर आज उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज ही एवढी गर्दी आहे. दसऱ्याला किती असेल, किती पटीने असेल. दसरा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आणि शिवतीर्थांवरच घेणार”, असा इशारा त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल ठाकरे काय म्हणाले?

“उद्या परवा सर्वोच्च न्यायालयातील निकाल अपेक्षित आहे. हा निकाल केवळ तुमच्या-माझ्या आयुष्याचा, शिवसेनेच्या भविष्याचा नाहीये. तर या देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की, नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे.”

Uddhav Thackeray: मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला खात्री आहे. मला आत्मविश्वास आहे. आपल्या न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, असं म्हणतात. कारण न्यायाचा तराजू हा सगळ्यांसाठी समान आहे. त्यासमोर कुणीही मोठं नाहीये. रामशास्त्री प्रभूने यांची परंपरा महाराष्ट्राला आहे. समोर राघोबा दादा असले तरी सुद्धा न्याय द्यायला कचरणारे न्यायमूर्ती तेव्हा नव्हते. तसेच न्यायमूर्ती आता सुद्धा आहेत, हा मला विश्वास आहे.”

‘खोके वाटा, लिलाव करा; कशाला लोकांना त्रास देता’ ठाकरेंचं टीकास्त्र

उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. “लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यात महत्त्वाचा स्तंभ न्याय देवता आहे. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. आम्हाला कळू द्या की आमचं बरोबर आहे. नाहीतर लोकशाही म्हणायचं तरी कशाला. मग मतं कशाला मागताय? निवडणुका कशाला घेताय? वाटा खोके आणि करा सरकारं. लिलाव करा की आम्ही एव्हढे खोके देऊ. कशाला लोकांना त्रास देताय. उन्हातान्हात माताभगिनींना रांगेत उभं करून मतदान करायला लावताय. मतदान झाल्यानंतर तुमची जी पैशाची मस्ती चालते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना तोंड आहे का तुम्हाला?”, असं उद्धव ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले.

अमित शाह- नरेंद्र मोदींवर तोफ! शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण

बाप पळवणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. “व्यासपीठावर आल्यानंतर बघितलं की, आमचे वडील आहेत ना जागेवर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकलीये, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रभर फिरतेय. मला आश्चर्य वाटतं की, एव्हढी वर्ष आपण सगळ्यांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला आणि त्यांच्या तोंडाची आता गटारगंगा उघडलीये”, असा पलटवार ठाकरेंनी शिंदे गटावर केला.

    follow whatsapp