नितीन शिंदे, प्रतिनिधी, सोलापूर
ADVERTISEMENT
सोलापूर: सांगोला येथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. त्यामध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर तसेच स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सध्या महाराष्ट्रात काळू बाळू यांचा तमाशा सुरू आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
विनायक राऊत सांगोल्याच्या सभेमध्ये काय म्हणाले?
एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदार संघात आज शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू बाळू तमाशाची, तर आमदार शहाजीबापू पाटील यांना सोंगाड्याची उपमा देत टीका केली आहे.
महाराष्ट्रात सध्या एक दाढीवाला आहे, एक बिनादाढीवाला. बिनदाढीवाल्याच्या मनात आलं की घेतला माईक. लगेच दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं, हे ज्यांना कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हे आपलं दुर्दैवं अस म्हणत विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
गोविंदांबाबत घेतलेल्या निर्णयावर काय म्हणाले विनायक राऊत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या पूर्वसंधेला गोविंदांबद्दल मोठा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण तसेच जखमी गोविंदांना मोफत उपचार, मृत किंवा जखमी गोविंदांना रोख रक्कम असा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या त्यावर विनायक राऊतांनी निशाणा साधला आहे. ”सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्या कडून मागील सरकारचे लोकहिताचे निर्णय रद्द केले जात आहेत. तर आता गोविंदा बद्दल घेतलेले निर्णय असे काहीही निर्णय घेतले जात असल्याने राज्यात काळू बाळू चा तमाशा प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकार असल्याचं ते म्हणाले आहेत.
शहाजीबापू पाटलांची उडवली खिल्ली
”आमदार शहाजी पाटील हा मिमिक्री करणारा माणूस आहे. ज्यांना तमाशा काढायचा आहे, त्यांनी खुशाल त्याला तमाशात सोंगाड्या म्हणून घेऊन जावे. ते चांगले काम करतील” असं म्हणत विनायक राऊत यांनी शहाजीबापूंची खिल्ली उडवली आहे. तसंच पुढे ते म्हणाले ”सांगोला तालुक्याला ही एक औदासा मिळाली आहे. ही औदासा घालण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे”
ADVERTISEMENT