Crime News : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका महिलेच्या हत्येचा गुन्हा खुद्द तिच्या पतीनेच नोंदवला होता, मात्र दोन वर्षांनंतर एका 'ओटीपी'मुळे ती महिला जिवंत असल्याचे समोर आले आहे. कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलखाव गावातील प्रियंका नावाच्या महिलेचा विवाह 2017 मध्ये संदीपशी झाला होता. संसाराला सात वर्षे पूर्ण झाली आणि त्यांना एक मुलगाही झाला, मात्र सततच्या घरगुती वादाला कंटाळून 1 जुलै 2024 रोजी प्रियंका दागिने घेऊन घरातून निघून गेली. तिने अयोध्येत सरयू नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला, पण राजस्थानहून दर्शनासाठी आलेल्या मंगलचंद्र नामक व्यक्तीने तिचे प्राण वाचवले. त्यानंतर प्रियंकाने मृत्यूचा विचार सोडून मंगलचंद्रसोबत राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे ती लिव्ह-इनमध्ये राहू लागली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार! प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी... अल्पवयीन आरोपी अटकेत
हत्येचा गुन्हा दाखल
दुसरीकडे, पत्नी आणि मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खचलेल्या संदीपने त्यांची खूप शोधमोहीम राबवली. त्यांना शोधण्यात अपयश आल्यावर, सासरच्या मंडळींनीच दागिन्यांच्या लोभापोटी मायलेकांची हत्या करून मृतदेह नदीत फेकला असावा, असा संशय त्याला आला. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने संदीपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानुसार 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियंकाचे आई-वडील, चुलत बहीण आणि इतर एका व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपासून पोलीस कागदोपत्री 'मृत' असलेल्या महिलेचा सुगावा लावत होते, पण काहीच हाती लागत नव्हते.
आधार कार्ड अपडेट करायला गेली अन्..
या प्रकरणाला कलाटणी मिळाली जेव्हा प्रियंका राजस्थानमध्ये आपली ओळख बदलण्यासाठी आधार केंद्रावर गेली. तिने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जुना नंबर टाकताच, त्याशी लिंक असलेल्या आणि पती संदीपच्या ताब्यात असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी गेला. अचानक आलेल्या या ओटीपीमुळे संदीप सावध झाला आणि त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान गाठून प्रियंका आणि तिच्या मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून ज्यांच्या खुनाचा आरोप सासरच्यांवर होता, ती महिला अचानक जिवंत समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले.
हे ही वाचा : मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... प्रेमत्रिकोणातून भयंकर हत्याकांड! शिवाजीनगरमध्ये खळबळ
मुलाने वडिलांना ओळखलेच नाही
प्रियंकाला जेव्हा बस्ती येथे आणण्यात आले, तेव्हा तिथे एक हृदयद्रावक आणि तितकाच नाट्यमय प्रसंग घडला. आपल्या पत्नीला आणि मुलाला जिवंत पाहून संदीप भावूक झाला, पण त्याने प्रियंकाला पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला. "मला फक्त माझा मुलगा हवा आहे," अशी मागणी त्याने केली, मात्र मुलाने संदीपला ओळखण्यासही नकार दिला आणि वडिलांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्यामकांत यांनी सांगितले की, हत्येचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने झाला होता, आता महिला जिवंत सापडल्याने तिचे जबाब नोंदवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
ADVERTISEMENT











