“घाईने मधुचंद्र आटोपला! लग्नच करायचे विसरले..” शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेची टीका

मुंबई तक

06 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. घाईने मधुचंद्र उरकला पण लग्न करायला विसरले अशी खोचक टीका सामनाच्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. घाईने मधुचंद्र उरकला पण लग्न करायला विसरले अशी खोचक टीका सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडलं की घाईने मधुचंद्र तर केला पण लग्न करायचे विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय राजकीय प्रकृती बिघडली होती. पण ज्यांच्या फुटिरतेमुळे किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आजारी पडले. अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी हे वृत्तही चिंताजनक आहे असे सामनामध्ये म्हटले आहे.

पुढे सामनामध्ये म्हटले ”एकनाथ शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडावेत हे चाळीस जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे त्यांनाच माहित पण सुप्रीम कोर्टात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासलं आहे. शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला, पण आमचीच शिवसेना खरी असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला असं लेखात म्हटलं आहे”.

उद्या शिंदे आणि त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील आणि जिवाजीराजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील तुम्ही कसले शिंदे, तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच. असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत. त्यांची जी मानसिक अवस्था आहे ती पाहता ते लोक असे दावे करू शकतात.

सर्वोच्च न्यायलायाने शिंदे गटाला फार टोकदार प्रश्न विचारला आहे. तुम्ही बंडखोर नाही तर मग नेमके आहात कोण? पक्षाचा नेता भेटत नाही म्हणून तुम्ही नवा पक्ष स्थापन करू शकता का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहेत. मुख्यमंत्रीपदाची लालसा आणि ईडी कारवायांमधून सुटका करून घेण्यासाठी शिंदे आणि त्यांच्या टोळीने विश्वासघात केला असंही या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे शिवसेना फुटली असं नाही

विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असे नाही. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे. त्याला त्यांच्या गटातील किती आमदार होकार देतील हा प्रश्नच आहे. पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांच्या गटात मारामाऱ्या होणार, हेही उघड आहे. त्यामुळे नव्या औषधोपचारासाठी शिंदे हे आजारी पडले असावेत. शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ चिन्ह आम्हालाच मिळेल व आमचीच सेना खरी या त्यांच्या दाव्यातील पोकळपणाही उघड झाला आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे आणि 56 वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, असे इतिहास सांगतो.

    follow whatsapp