तर श्रद्धाचा जीव वाचला असता : तक्रार अर्ज समोर आल्यावर गृहमंत्री अन् पोलीस काय म्हणाले?

मुंबई तक

23 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. आफताब पूनावाला श्रद्धाला मागील दोन वर्षांपूर्वीपासूनच सातत्यानं मारहाण करत होता, आणि याला दुजोरा देणारा एक तक्रार अर्ज आता समोर आहे. श्रद्धा वालकर हिने 2020 मध्ये पोलिसांकडे आफताबची तक्रार केली होती. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा वालकरने पोलीस ठाण्यात तक्रार […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. आफताब पूनावाला श्रद्धाला मागील दोन वर्षांपूर्वीपासूनच सातत्यानं मारहाण करत होता, आणि याला दुजोरा देणारा एक तक्रार अर्ज आता समोर आहे. श्रद्धा वालकर हिने 2020 मध्ये पोलिसांकडे आफताबची तक्रार केली होती.

हे वाचलं का?

23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा वालकरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रार अर्जात, आफताब तुकडे तुकडे करून फेकून देईन अशी धमकी देत असल्याचा उल्लेख आहे. श्रद्धाने म्हटलेलं आहे की, आफताब अमीन पूनावाला हा मला शिवीगाळ करून मारहाण करतोय. आज त्याने गळा दाबून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.

“तो मला धमकी देत आहे की, माझे तुकडे तुकडे करून फेकून देईन. सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे. मला जिवे मारण्याची धमकी देत असल्यानं पोलिसांत तक्रार देण्याचं माझं धाडस होत नव्हतं,” असंही श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

श्रद्धा वालकर तक्रारीत पुढे म्हणते की, “आफताब मला मारहाण करतो. माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती आहे. आता त्याच्यासोबत राहण्याची माझी इच्छा नाही. तो मला ब्लॅकमेल करतो. त्यामुळे माझं काही बरंवाईट झालं तर त्याला तोच जबाबदार असेल”, असंही श्रद्धाने दोन वर्षापूर्वी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

तर श्रद्धाचा जीव वाचू शकला असता : फडणवीस

दरम्यान, हा तक्रार अर्ज समोर येताच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते.

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणावर बोलताना अपर पोलीस आयुक्त सुहास बावचे म्हणाले, पत्र व्हायरल होण्याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र जी तक्रार तुळींज पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती, त्या तक्रारीवर चौकशी करण्यात आली आहे. चौकशीअंती तक्रारदारांनी स्वतः माझी काही तक्रार राहिली नसल्याचा जबाब दिला होता. त्यानुसार त्यांना समजपत्रही देण्यात आले होते. ही तक्रार कधी मागे घेण्यात आली होती, किंवा तिला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते, याबाबत विचारले असता ते म्हणाले आपल्याला पोलीस स्थानकातून अधिक माहिती मिळू शकेल.

    follow whatsapp