मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवला, साहित्य संमेलानाध्यक्ष भारत सासणे यांची खंत

मुंबई तक

• 01:25 PM • 22 Apr 2022

९५ वं अखिल भारतीय संमेलन हे उद्गिर या ठिकाणी होतं आहे. शरद पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी या मंचावर आपले विचार मांडले. तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनीही आपले परखड विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मांडले. Sharad Pawar Speech : देशातील हिंसा, प्रोपागंडा आणि माध्यमे; शरद पवार यांचं संपूर्ण […]

Mumbaitak
follow google news

९५ वं अखिल भारतीय संमेलन हे उद्गिर या ठिकाणी होतं आहे. शरद पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी या मंचावर आपले विचार मांडले. तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनीही आपले परखड विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मांडले.

हे वाचलं का?

Sharad Pawar Speech : देशातील हिंसा, प्रोपागंडा आणि माध्यमे; शरद पवार यांचं संपूर्ण भाषण

काय म्हणाले भारत सासणे?

“आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसंच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र हा चेहरा धूसर होत चालला आहे, हरवतो आहे.”

“मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलिकडे मोठ्या प्रमाणात होत असताना हा चेहरा दिसनेसा होतो आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यात प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो हे पाहिलं पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावं लागेल.”

“मुख्य म्हणजे सामान्य माणसाबाबतचं कोणतं आकलन आपल्या लेखकाला झालं आहे हा प्रश्न तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही प्रेयस आणि श्रेयस यामध्ये अडकला आहे. तो सत्य म्हणजे काय, याचा शोध घेत नाही. नैतिकतेचा आग्रह धर नाही आणि व्याप अशा जीवनाचा अभ्यस करत नाही हे माझं निरीक्षण आहे.”

“सध्या सर्वसामान्य माणूस हा सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार हे त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. असा कुणीही मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही.”

“आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते का? हा जुनाच प्रशअन आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या सआदत हसन मंटोने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअर किपर, टांगेवले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे अशा सगळ्यांच्या जीवन व्यवहाराबाबत विलक्षण करूणा आणि आस्था मंटोच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखाद मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही. या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”

    follow whatsapp