Shivsena : उद्धव ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह वाचलं; उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

दिल्ली : उच्च न्यायालयानं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिलासा देत ‘मशाल’ चिन्हावर शिक्कामोर्तब केला. तसंच ‘मशाल’ चिन्हावर आक्षेप घेणारी समता पक्षाची याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावली. २००४ मधील फुटीनंतर पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उदय मंडल यांच्या नेतृत्वातील गट आता या चिन्हावर दावा करु शकत नाही, असंही न्यायालयानं सांगितलं. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:41 AM • 19 Oct 2022

follow google news

दिल्ली : उच्च न्यायालयानं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिलासा देत ‘मशाल’ चिन्हावर शिक्कामोर्तब केला. तसंच ‘मशाल’ चिन्हावर आक्षेप घेणारी समता पक्षाची याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावली. २००४ मधील फुटीनंतर पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उदय मंडल यांच्या नेतृत्वातील गट आता या चिन्हावर दावा करु शकत नाही, असंही न्यायालयानं सांगितलं.

हे वाचलं का?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरेंच्या गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला ढाल – तलवार हे चिन्ह दिलं आहे. मात्र निवडणूक आयोगानं चिन्ह दिल्यानंतर समता पार्टीनं या चिन्हावर दावा केला. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

मात्र २००४ साली समता पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हे चिन्ह मुक्त यादीत असल्याचं उत्तर आयोगाकडून देण्यात आलं. तसंच २००४ नंतर समता पक्षानं देखील कोणतीही निवडणूक लढविली नाही, त्यामुळे हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं असल्याची माहिती देण्यात आली. परंतु आयोगाच्या उत्तरानं समता पक्षाचं समाधान न झाल्यानं पक्षानं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

काय म्हणाले तृणेश देवळेकर :

दरम्यान, समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनीही निवडणूक आयोगाला लेखी पत्र दिलं होतं. यात २०१४ आणि २०२१ मध्ये बिहार ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवल्या? हे जाहीर करावं अशी मागणी केली होती. चिन्ह हे कोणत्याही पक्षाची ओळख असते. धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसं दुःख झालं तसं दुःख आम्हालाही होतं आहे. झारखंडमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चाकडे आहे. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवली तर शिवसेनेला चालेल का? असा सवालही त्यांनी विचारला होता.

पत्रात काय लिहिलं?

शिवसेनेला “मशाल” हे निवडणूक चिन्ह देण्यास आमचा आक्षेप आहे. कारण हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव आहे. 2004 मध्ये निवडणूक आयोगाने समता पक्षाला मान्यता नसलेला पक्ष म्हणून घोषित केले होते, परंतु यापूर्वी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. मशाल हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं.

समता पक्ष सातत्याने निवडणूक लढवत आहे, भविष्यात आपल्याला मान्यता प्राप्त होऊ शकते, मग हे चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला कसे देता येईल? त्यामुळे आपणास विनंती आहे की हे निवडणूक चिन्ह समता पक्षासाठी राखून ठेवावे. हे चिन्ह शिवसेनेकडून परत घ्यावे. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल, तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायव्यवस्थेकडेही जाऊ शकतो.

    follow whatsapp