राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिग्गज नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. सह्याद्री विश्रामगृहात ही बैठक दोन तास चालली. शरद पवार यांच्यासह बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमधले मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याही निवडणुका आहे. याबाबत काय तयारी करायची याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. तर काही ठिकाणी स्वबळावर लढायचं की काय निर्णय घ्यायचा याची चर्चा बैठकीत झाली.
जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही पक्षाची भूमिका असल्याचंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. महामंडळांच्याबाबतीत तीन पक्षांचे नेते एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
आणखी काय झालं बैठकीत?
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणा, इतर संस्थांचा दुरपयोग होतो आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. जे काही कायदेशीर पर्याय आहेत त्यांचा आधार घेऊन आपण त्यांना उत्तर देऊ असाही ठराव या बैठकीत करण्यात आला आहे.
मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर आणि दहीहंडीवरून भाजपने राजकारण केलं आहे. केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात अधिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे तरीही भाजपकडून दुटप्पीपणा केला जातो आहे त्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
आज आयोजित बैठकीला नवाब मलिक, जयंत पवार, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ यांच्यासह सगळेच मंत्री उपस्थित होते.
ADVERTISEMENT
