संजय राऊत यांची चूक काय? त्यांचा गुन्हा काय? त्यांना अटक करण्यात आली आहे. आज मी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सध्याचं राजकारण अत्यंत घृणास्पद पद्धतीने सुरू आहे. भाजपचं राजकारण हे अत्यंत घृणास्पद आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे भाजपबाबत?
जे. पी. नड्डा यांनी जे वक्तव्य केलं आहे ती घृणा दाखवण्याचीच सुरूवात आहे. शिवसेना किंवा इतर पक्ष संपवायचं असेल तर संपवा. कोश्यारी जे म्हणाले हिंदूंमध्ये फूट पाडायचीच सुरूवात आहे. नड्डा जे म्हणाले त्यातून भाजपचं कारस्थान भेसूरपणे समोर आलं आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भाजपची पद्धत ही आता हिटलरप्रमाणे होऊ लागली आहे. जो आपल्यासोबत येईल त्याला सोबत घ्या, धाक दाखवा किंवा चिरडून टाका असं धोरण चाललं आहे.
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी म्हणाले होते तसंच आता मलाही वाटू लागलं आहे. सगळ्या जनतेनी या घाणेरड्या राजकारणाची ओळख करून घ्यावी. प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचं काम भाजपकडून केलं जातं आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. संजय राऊत यांची चूक नसताना ते स्पष्ट बोलतात म्हणून अटक करण्यात आली आहे. राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ मानला जातो. भाजपकडून बळाचा वापर सातत्याने केला जातो. मात्र वेळ प्रत्येकाची येते, देश कुठे चालला आहे कुठल्या दिशेने चालला हे जनता ठरवते हे विसरू नका असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, जे. पी. नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं २०-३० वर्षे इतर पक्षात काम करून भाजपमध्ये येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्वशून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपमध्ये लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे, तसंच हे घातक वक्तव्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
ADVERTISEMENT