शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेत भाषण करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. तसंच भाजप आणि एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटावरही टीका केली. या सगळ्या भाषणाची चर्चा होत असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे असंच बोलत राहिले तर उद्या संजय राऊत यांच्यासोबत आतमध्ये जातील असंही वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे नारायण राणेंनी?
”छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना चालवली. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामीच उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे, खोटं बोलतो. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिला हा काळीमा आहे महाराष्ट्रासाठी. मराठी माणूस हद्दपार झाला, उद्धव ठाकरेंचे एक बंगल्याचे दोन बंगले झाले मुंबईत.
आदिलशाह, अफझलखान आणि हे शाह.. असं बोलणं शोभतं का? हे सगळं बोलणं गुन्हा आहे. उद्या आतमध्ये जाल संजय राऊतचे सोबती म्हणून. जे काही बोललेत ना गिधाडं, अमुक तमुक ते कुणाला उद्देशून आहे माहित आहे. त्यामुळे आत जाशील. सुशांत प्रकरणातून तुझा मुलगा सुटलेला नाही. खोक्यांचा विषय तुझा आहे. ”
आदिलशाह आणि अमित शाह यांची तुलना करता? हिंदू मुस्लिम फरक कळत नाही एवढी भ्रष्ट बुद्धी उद्धव ठाकरेंची झाली आहे का? देशाचे गृहमंत्र्यांना असं बोलताना लाज शरम वाटली नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा उल्लेख मी लांडगा म्हणून करतो. लांडगा लबाड असतो, खोटारडा असतो आणि केलेल्या उपकाराची जाणीव त्याला नसते. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख लांडगा असा केला. उद्धव ठाकरेंची पाच खासदार आणि दहा आमदार निवडून आणण्याची ताकद नाही. त्यांनी ही भाषा वापरावी? हे शोभतं आहे का? असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं
मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत. लचके तोडणारी अवलाद आहे ती गिधाडांची. ती गिधाडं फिरू लागली आहेत. मुंबई बळकावयची आहे, मुंबई गिळायची आहे. हे काही आजचं नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचून मोठे झालो आहोत. त्यावेळी अनेक आदिलशाह, निजामशाह चालून आले होते. त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह मुंबईत येऊन गेले. काय बोलले? शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहित नाही इथे समोर बसलेली गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवायचा प्रयत्न कराच तुम्हाला आम्ही आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
ADVERTISEMENT