Inside Story : अमित शाहांचा मध्यरात्री दौरा अन् दुपारी विजय रुपाणींनी दिला राजीनामा

विजय रुपाणी यांनी अचानक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तराखंड, कर्नाटकानंतर भाजपने गुजरातमध्ये नेतृत्वात बदल केला असून, रुपाणींच्या राजीनाम्या अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रात्रीतून दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यानंतरच रुपाणींनी राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:36 AM • 12 Sep 2021

follow google news

विजय रुपाणी यांनी अचानक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तराखंड, कर्नाटकानंतर भाजपने गुजरातमध्ये नेतृत्वात बदल केला असून, रुपाणींच्या राजीनाम्या अगोदर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रात्रीतून दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यानंतरच रुपाणींनी राजीनामा दिला.

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. असं असतानाही राजीनामा द्यावा लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. राजीनामा दिल्यानंतर आता अमित शाह यांनी मध्यरात्री गुजरातचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेतृत्व बदलाच्या संदर्भात गुजरातचा दौरा केला होता. अमित शाह शुक्रवारी मध्यरात्री अचानक गुजरातला गेले होते. तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली.

अनेक तास चाललेल्या या बैठकीतच विजय रुपाणींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं निश्चित झालं होतं. मात्र, हा निर्णय पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. त्यामुळे याबद्दल कुणालाही अंदाज लावता आला नाही. रात्रीतून बैठक करून अमित शाह सकाळीच दिल्लीत परतले होते.

रुपाणींना मुख्यमंत्रीपदावरून का हटवले?

विजय रुपाणींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि विरोधकांच्या बाजूनं वाढत असलेला जनाधार यासह विविध कारणामुळे रुपाणींना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं.

एप्रिल-मे दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली होती. यावरून गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला झापलं होतं. न्यायालयाने फटकारल्यानंतर विरोधकांकडूनही रुपाणी सरकारला घेरण्यात आलं.

दुसरीकडे काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आपकडून कोरोना काळातील विजय रुपाणी सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचं काम झालं. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अपर्ण करत आपकडून भाजप सरकार अपयशी ठरल्याचं सांगितलं जात आहे.

RSS चा सर्व्हे काय?

सूत्रांच्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक सर्वेक्षण केलं. विजय रुपाणी सरकारसंदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ज्यात विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात भाजपला पुढील विधानसभा जिंकण अवघड असल्याचं दिसून आलं.

गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनीही ट्वीट करून याच सर्वेक्षणाचा हवाला दिलेला आहे. ‘ऑगस्टमध्ये आरएसएस व भाजपने केलेल्या गुप्त सर्वेक्षणातील माहिती धक्कादायक होती. हेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदण्याचं कारण आहे. काँग्रेसला ९६ ते १०० जागा, भाजपला ८० ते ८४ जागा, आपला ३ टक्के मतं, तर एमआयएमला १ टक्के मते मिळत असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं’, असं पटेल यांनी म्हटलेलं आहे.

    follow whatsapp