Oxygen, Remdesivir, Vaccines सह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू-राजेश टोपे

सौरभ वक्तानिया

• 03:03 PM • 06 May 2021

देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीसीमध्येही हा मुद्दा मांडला गेला होता. साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते. त्यावेळी आपण तयार असलं पाहिजे असं सुचवण्यात आलं होतं. तयार असणं म्हणजे काय तर पुरेसे बेड्स, डॉक्टर्स, रूग्णसेविका उपलब्ध असणं. ऑक्सिजन, औषधं ही […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीसीमध्येही हा मुद्दा मांडला गेला होता. साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते. त्यावेळी आपण तयार असलं पाहिजे असं सुचवण्यात आलं होतं. तयार असणं म्हणजे काय तर पुरेसे बेड्स, डॉक्टर्स, रूग्णसेविका उपलब्ध असणं. ऑक्सिजन, औषधं ही उपलब्ध असणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आता आम्ही तयारी करतो आहोत असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

आपण डॉक्टर्स वाढवू शकत नाही पण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न आपण सुरू केले आहे. लिक्विड ऑक्सिजनलाही मर्यादा आहेत. महाराष्ट्रात 1250 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन तयार होतो. त्यापुढे लिक्विड ऑक्सिजनचं उत्पादन आपण करू शकत नाही. बाहेरून जे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळतो आहे त्यामध्येही अनेक राज्यं अडवणूक करत आहेत असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. कर्नाटकमधल्या बेल्लारीने आपलं जे 60 मेट्रिक टन हक्काचं आहे ते थांबवलं आहे. त्यामुळे आपल्याला तेवढी तूट आज भासते आहे. अशा स्वरूपातल्या अडचणींवर मात करण्यासाठी हवेतलं ऑक्सिजन कनव्हर्ट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. PSA प्लांट्स तालुक्यांमध्ये बसवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स विकत घेण्यावर आपण भर देतो आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. बाहेर देशातून आपल्याला जवळपास तीन लाख रेमडेसिवीर मिळणार आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या काही मान्यता त्या कंपन्यांना लागणार आहेत त्या कंपन्यांना त्यांच्या स्तरावर घेण्यास सांगितलं आहे. त्याचा पाठपुरावाही घेतला जातो आहे. तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, औषधं यांच्यासह महाराष्ट्र सज्ज आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

तिसऱ्या लाटेत कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. आरोग्य विभागातल्या १०० टक्के जागा आपण भरणार आहोत. मागच्या वेळी आपण 50 टक्के जागा भरल्या होत्या. आता अ, ब, क, ड अशा सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. आरोग्य सेवकांपासून अगदी ड्रायव्हरपर्यंत सर्व जागा भरण्यासाठीची आमची तयारी सुरू आहे.

लसीकरणाबाबत काय म्हणाले राजेश टोपे?

लसीकरणाबाबत दोन विषय आहेत एक गट आहे तो 45 वर्षे आणि त्यापुढील नागरिक जे साधारण सव्वातीन कोटींच्या घरात आहेत. तर 18 ते 44 या वयोगटातील महाराष्ट्रातील संख्या ही 5 कोटी 71 लाख एवढी आहे. 18 ते 44 या गटासाठी 12 कोटी डोसची गरज आहे. ते काम राज्य शासनाचं आहे ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत त्यानुसार आपण ते लसीकरण करत आहोत. देशात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राज्यं आहेत की ज्यांनी १ मे रोजी लसीकरण सुरू केलं.

आज घडीला 3 लाखमधले साधारण 2 लाख डोस दिले आहेत. आता 20 लाख डोस उपलब्ध झाले आहेत सहा कोटी लोकांना देण्याच्या डोसेसच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 18 ते 44 या गटासाठी नोंदणी गरजेची आहे. या गटाला आमची विनंती आहे की संयम पाळा आणि शिस्त पाळा. आपल्याकडे लसी कमी असल्याने आपण संथ गतीने जातो आहोत ही बाब लक्षात घ्यावं. १२ कोटी डोसेस उपलब्ध नाहीत ते एकरकमी घेण्याची आमची तयारी आहे. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक अशा तीन लसी भारतात आहेत. त्यांनाही आम्ही सांगितलं आहे मात्र त्यांच्याकडे एवढं उत्पादन अद्याप नाही असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

रेमडेसिवीर बाबत काय म्हणाले राजेश टोपे?

महाराष्ट्राला आज घडीला 55 हजार रेमडेसिवीर मिळण्याची गरज आहे. मात्र एवढ्या प्रमाणात रेमडेसिवीर मिळत नाहीत. ज्या कंपनीजना हे सांगितलं आहे त्यातल्या काही कंपन्या वेळेवेर पुरवठा करत नाहीत. त्या कंपनीजना आम्ही वारंवार सांगतो आहोत की आम्हाला रेमडेसिवीर वेळेत पुरवावेत. केंद्रालाही आमची नम्र विनंती आहे की आम्हाला कोटा वाढवून द्यावा. यासंदर्भात मी आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना विनंती करणार आहे. त्यासंदर्भातलं पत्रही मी लिहिणार आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. सध्या सात कंपन्या रेमडेसिवीरचं प्रॉडक्शन करत आहेत आणि उत्पादन आता वाढलं आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राची रेमडेसिवीरची गरज भागवावी ही माझी केंद्र सरकारला विनंती आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp