विधानसभेत ठाकरे गटाचं काय होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

• 04:22 PM • 16 Aug 2022

१७ ऑगस्टपासून महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. हे अधिवेशन जसं विरोधकांसाठी महत्त्वाचं आहे तसंच सरकारसाठीही महत्त्वाचं असणार आहे. कारण सरकार स्थापन झाल्यापासून हे पहिलं अधिवेशन आहे. त्यात शिवसेना दुभंगली असून शिंदे गट म्हणजेच सत्तेत असणारा गट आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणतो आहे. त्यांच्यासोबत ४० आमदारांचं बळ आहे. तर दुसरीकडे आहे ठाकरे गट […]

Mumbaitak
follow google news

१७ ऑगस्टपासून महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. हे अधिवेशन जसं विरोधकांसाठी महत्त्वाचं आहे तसंच सरकारसाठीही महत्त्वाचं असणार आहे. कारण सरकार स्थापन झाल्यापासून हे पहिलं अधिवेशन आहे. त्यात शिवसेना दुभंगली असून शिंदे गट म्हणजेच सत्तेत असणारा गट आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणतो आहे. त्यांच्यासोबत ४० आमदारांचं बळ आहे. तर दुसरीकडे आहे ठाकरे गट त्यांच्याकडे १५ आमदार आहेत. त्यांनीही आम्हीच शिवसेना आहोत हेच म्हटलं आहे ते विरोधात आहेत. ही लढाई सुप्रीम कोर्टातही गेली आहे. तरीही अधिवेशनात हे गट समोरासमोर येणार आहेत. ठाकरे गटाचं काय होणार? याचं उत्तर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई तकच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिलं आहे.

हे वाचलं का?

राहुल नार्वेकर यांचं हे पहिलं अधिवेशन आहे. ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे तसंच सरकार विरूद्ध विरोधक असाही सामना असणारच आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की माझी नियुक्ती झाल्यानंतर ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व मी करतो त्याच भागात विधानसभा येते. राज्याला २४ तास काम करणारा अध्यक्ष मिळाला आहे. चार माजी अध्यक्ष अधिवेशनात असणार आहेत असे अनेक योगायोग या अधिवेशनात असणार आहेत असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. भाजपने त्यांना हे पद दिलं आहे. कारण भाजपच्या तिकिटावर राहुल नार्वेकर निवडणूक जिंकले आहेत. तिसरीकडे अजित पवार आहेत त्यांच्याशी राहुल नार्वेकर यांचं नातं आहे. ही सगळी तारेवरची कसरत आहे असं वाटत नाही का? असं विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले की माझी नियुक्ती झाल्यापासूनच या तिन्ही बाबी उपस्थित करण्यात आल्या. महाराष्ट्रातली परंपराच ही आहे की नाती, संस्कृती जपण्याची परंपरा आपल्या राज्यात आहे. माझे सहकारी आमदार, इतर पक्षातले सदस्य हे सगळेजण ही संस्कृती परंपरा जपतील यात माझ्या मनात शंका नाही असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच आली नव्हती की एका पक्षाची दोन शकलं झाली आहेत, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे. पहिल्यांदाच एक पक्ष जो विरोधात असताना म्हणतोय की आम्ही शिवसेना आहोत. तसंच एक गट जो सत्तेत आहे तो म्हणतोय आम्हीच शिवसेना आहोत. या सगळ्याकडे कसं पाहता? यावर राहुल नार्वेकर म्हणाले की विधानसभा अध्यक्ष म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती काम करते ती महाराष्ट्र विधानसभेचे नियम आणि प्रथा परंपरा यामधूनच होतील. नागरिकांचे अधिकार जपूनच निर्णय केले जातील. क्लासिक म्हणावी अशी परिस्थिती राज्यात आहे. मात्र कोणताही अडथळा न येता सदनाचं कामकाज कशी चालेल यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला खात्री आहे की नियमांच्या अनुषंगानेच सर्व सदस्य काम करतील.

शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट दिसतंय, एका बाजूला ४० आमदारांसह एकनाथ शिंदे आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आहे. आमची भूमिका बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीत असली पाहिजे असं ठाकरे गटालाही वाटतं आहे त्याबाबत काय सांगाल? असंही विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले की या समितीतल्या सदस्यांची नेमणूक नियमाप्रमाणेच होते. उर्वरित सदस्य जे आहेत ते संसदीय गटाच्या अनुसारच असतो. त्यांची नावं त्या त्या गटाचे नेते शिफारस करत असतात. आज आमच्या रेकॉर्डवर जे नेते आहेत त्यांनी जी नावं मागितली ती नावं समाविष्ट करण्यात आलेली नाही. शिवसेनेत दोन गट असलेली माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे माझ्यापुढे प्रत्येक गटाचा एकच नेता आहे असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp