दिलीप वळसे-पाटलांना पवारांनी गृहमंत्री का केलं?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या बराच अडचणीत सापडला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी कोणत्या नेत्याची निवड करायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निर्माण झाला होता. पण अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुनेजाणते नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्री म्हणून निवड केली आहे. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:55 PM • 05 Apr 2021

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या बराच अडचणीत सापडला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी कोणत्या नेत्याची निवड करायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निर्माण झाला होता. पण अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुनेजाणते नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्री म्हणून निवड केली आहे.

हे वाचलं का?

शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का केली?

दिलीप वळसे-पाटील ही थेट शरद पवार यांनी केलेली निवड आहे. वळसे-पाटील हे पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वळसे-पाटील यांची गेल्या काही वर्षात प्रकृती थोडीशी ठीक नसल्याने ते सार्वजनिक जीवनात कमी दिसत होते. पण आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सक्रीय झाले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर एकमत झालं आहे.

दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती का झाली असावी?

  • अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात गृहविभाग ज्या पद्धतीने आरोपांमध्ये वेढला गेला आहे ते पाहता हे खातं हाताळण्यासाठी तेवढीच सक्षम व्यक्ती असावी यासाठी वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांच्या नावावर विचार विनिमय झाला मात्र अखेर वळसे-पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं

  • वळसे-पाटलांवर आजवर कोणतेही आरोप झालेले नाहीत. सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे नेते अशी त्यांची ओळख आहे.

  • सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या-ज्या वेळेस कोणत्याही खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत तेव्हा-तेव्हा दिलीप वळसे पाटलांकडे त्या खात्याचा कारभार सोपवला गेलाय आणि तो त्यांनी तितक्याच तडफेने हाताळला देखील आहे.

दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे ‘संकटमोचक’

  • राज्यात विलासराव देशमुख यांचं सरकार सत्तेत असताना लोडशेडिंगवरुन उर्जा खात्याविरोधात प्रचंड नाराजी होती. त्यामुळे तेव्हा हे खातं दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी या खात्यात काही अमूलाग्र बदल घडवून आणले होते.

  • याशिवाय वैद्यकीय शिक्षण देखील हे खातं देखील त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळलं होते.

  • थेट शरद पवारांसोबत काम केल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कसं काम करायचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री होणारे दिलीप वळसे पाटील आहेत कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे वळसे-पाटलांची निवड?

  • दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्री करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत कारणं आहेत. ती म्हणजे अजित पवारांकडे गृहविभाग जाणार नसल्याचं स्पष्टच झालं होतं. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हे खातं गेलं असतं तर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागलं असतं. अशावेळी त्या जागेसाठी दुसरा नेता शोधावा लागला असता. छगन भुजबळ यांची ईडी केस सुरु आहे त्यामुळे त्यांच्याकडे हे खातं देता येत नाही. राजेश टोपे हे त्या मानाने फार नवखे ठरले असते. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील हीच योग्य निवड असल्याचं पवारांना वाटतं.

  • गृहखात्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक असा मंत्री हवा की जो या खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करु शकेल आणि ती गोष्ट वळसे-पाटील योग्यरित्या करु शकतात. त्यामुळे देखील त्यांची निवड करण्यात आली असावी.

राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव

  • दिलीप वळसे-पाटील हे विरोधकांना योग्यरित्या हाताळू शकतात. कारण वळसे-पाटलांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

  • महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. अर्थसंकल्प सादर करण्यात त्यांची हातोटी होती. तर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी अत्यंत संयमीपणे काम केल्याचं दिसून आलं आहे.

  • शरद पवारांचे पीए म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यामुळे पवारांच्या कामाची शैली त्यांनी अगदी जवळून पाहिली आहे.

  • १९९० साली किसनराव बाणखेले या जुन्या जाणत्या नेत्याचा पराभव करुन दिलीप वळसे-पाटील यांनी राजकारणात एंट्री केली होती. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यामुळे ते तेव्हा जायंट किलर ठरले होते.

  • राज्यात युतीचं सरकार असताना दिलीप वळसे-पाटील यांची विरोधी पक्षातील अभ्यासू नेता अशी ओळख तयार झाली होती. त्याचवेळी ते शरद पवारांच्या नजरेत भरले होते. त्याचवेळेस त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देखील मिळाला होता.

  • राज्यातील युतीचं सरकार जाऊन जेव्हा आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती देण्यात आली होती.

  • प्रत्येक वेळी त्यांनी अडचणीत असलेल्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.

  • पक्षाची आणि गृहखात्याची प्रतिमा मलीन झालेली असताना आता ती सुधारण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा नेता हवा यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे.

  • तीन पक्षाचं सरकार असताना गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील ही निवड चपखल ठरु शकते.

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पाहा नवे खातेबदल; कोणाकडे कोणतं खातं?

यासारख्या अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ही निवड सार्थ ठरविण्यासाठी वळसे-पाटलांना देखील बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

    follow whatsapp