काल टीका, आज कौतुक; पंतप्रधान मोदींकडून पवारांवर स्तुतीसुमनं!

मुंबई तक

• 08:10 AM • 09 Feb 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. खरंतर काल (सोमवार) राज्यसभेतच कृषी कायद्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. पण आज लागलीच त्यांनी पवारांचं कौतुक देखील केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या दोन्ही गोष्टीबाबत चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभा […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. खरंतर काल (सोमवार) राज्यसभेतच कृषी कायद्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. पण आज लागलीच त्यांनी पवारांचं कौतुक देखील केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या दोन्ही गोष्टीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसचे राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतला कार्यकाळ आज संपत असल्याने त्यांच्या सभागृहातील अखेरच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी भाषण केलं. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनीही भाषण करताना आझाद यांचं बरंच कौतुक केलं. याचवेळी त्यांनी पवारांचं देखील कौतुक केलं.

मोदींकडून आज पवारांचं कौतुक, पाहा काय म्हणाले!

गुलाम नबी आझाद यांच्याबाबत बोलत असताना पंतप्रधान मोदी असं म्हणाले की, ‘मला चिंता या गोष्टीची आहे की, गुलाब नबी यांच्यानंतर हे पद जे सांभाळणार आहेत त्यांना गुलाब नबी यांची जागा घेणं बरंच जड जाईल. कारण गुलाब नबी हे आपल्या पक्षाचा तर विचार करायचेच पण ते आपल्या देशाची आणि सभागृहाची देखील तेवढीच चिंता करायचे. ही छोटी गोष्ट नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. मी शरद पवार यांना देखील याच कॅटेगरीत ठेवतो. ते सभागृह आणि देशाच्या चिंतेला प्राधान्य देणारे नेते आहेत.’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करतानाच शरद पवारांचं देखील कौतुक केलं.

पंतप्रधानांनी काल केली होती पवारांवर टीका

दरम्यान, काल (8 फेब्रुवारी) नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करताना शरद पवारांवर टीका देखील केली होती. यावेळी पंतप्रधान मोदी असं म्हणाले होते की, ‘आमचे आदरणीय शरद पवार यांनी कृषी सुधारणांची वकिली केली होती. शरद पवार यांनी आताच सांगितलं की, मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेक नेत्यांनी देखील कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं होतं. पण आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला.’ असं म्हणत मोदींनी पवारांवर निशाणा साधला होता.

गुलाम नबी आझादांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक…

आज (9 फेब्रुवारी) राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे दिसून आले. ‘काही वर्षांपूर्वी गुजरातमधील काही व्यक्ती काश्मिरमध्ये अतिरेकी हल्ल्यात अडकले होते. त्यावेळी त्यांना बाहेर काढण्यासाठी गुलाम नबी आझाद आणि प्रवण मुखर्जी यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांचे हे प्रयत्न आपण कधीच विसरु शकणार नाही.’ असं म्हणत असताना मोदी राज्यसभेत भावूक झाले.

    follow whatsapp