नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची मिळवल्यानंतर योगींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या पर्वाला आज सुरूवात झाली. लखनौतील इकाना स्टेडियमवर योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी केशव मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि ५३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथ विधी सोहळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मोठे नेते आणि काही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगींना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सिद्धार्थनाथ सिंह, मुकुट बिहारी वर्मा यांना दुसऱ्या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्याचबरोबर मोहसिन रजा यांच्याऐवजी दानिश आझाद यांना योगींच्या मंत्रिमंडळातील मुस्लीम चेहरा म्हणून स्थान देण्यात आलं आहे. दानिश आझाद विद्यार्थी दशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले होते. नंतर ते भाजपत आले.
योगींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री
सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद.
योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठोड, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालु.
योगींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री
मयंकेश्वर सिंह, दिनेश खटीक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत, सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनुप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठोड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी, विजय लक्ष्मी गौतम.
ऐतिहासिक शपथ आणि आजपर्यंतचा राजकीय प्रवास
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ऐतिहासिक किमया योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवली आहे. ३५ वर्षांनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात या इतिहासाची पुनरावृत्ती घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार योगी आदित्यनाथ भाजपचे उत्तर प्रदेशातील पहिलेच नेते आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा १९९८ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. भाजपच्या तिकिटावर योगी आदित्यनाथ विजयी झाले. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे सर्वात तरुण खासदार होते. त्यानंतर १९९०, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत योगी आदित्यनाथ यांनी विजय मिळवला.
१२ सप्टेंबर २०१४ रोजी महंत अवैद्यनाथ यांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथ गोरखनाथ मठाचे महंत बनले. त्यानंतर २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.
ADVERTISEMENT
