पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026' प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पारंपरिक पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, धनादेश आणि 'गीतारहस्य'ची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
ADVERTISEMENT
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात अजित डोवाल यांनी देशातील तरुणांना, विशेषतः Gen-Z पिढीला, स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रहित, लोकमान्य टिळकांचे विचार आणि देशाच्या नेतृत्वाविषयीही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.
'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे'
डोवाल म्हणाले की, 'आजच्या तरुण पिढीने स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. काहीजण स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करणं असा अर्थ काढतात, मात्र ही विचारसरणी चुकीची आहे.' असं म्हणत त्यांनी यावेळी जेन-झीचे कान टोचले.
हे ही वाचा>> 'माझं पुण्याशी 76 वर्षांपूर्वीचं नातं, दर मंगळवारी मी...', अजित डोवालांनी पुण्याविषयी नेमकं सांगितलं तरी काय?
डोवाल पुढे म्हणाले, 'राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही मार्ग स्वीकारू नये. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या वैयक्तिक हितापेक्षा देशहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. भारताला अधिक सक्षम, सुरक्षित आणि शक्तिशाली बनवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.'
मोदी-शाह यांच्या नेतृत्वाचं कौतुक
अजित डोभाल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं.
ते म्हणाले, 'भारत सध्या अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत देशाला मजबूत नेतृत्व लाभलं आहे, हे आपलं भाग्य आहे. भारत झपाट्याने प्रगती करत असल्याने अनेक विरोधी शक्तींना ही प्रगती खटकत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रथम राष्ट्रहिताचा विचार करायला हवा."
लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेण्याचं आवाहन
डोवाल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. लहानपणी पुण्यात शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षकांकडून प्रथम लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी ऐकल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा>> 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
'ब्रिटिशांच्या राजवटीत अनेक जण भीतीपोटी गप्प बसत असताना लोकमान्य टिळकांनी निर्भीडपणे आवाज उठवला. तुरुंगवास भोगल्यानंतरही त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रकार्याची वाट सोडली नाही', याची आठवण करून देत डोवाल यांनी तरुणांना लोकमान्य टिळकांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं.
तरुणांना राष्ट्रनिर्माणाचं आवाहन
Gen-Z पिढी ही भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाची शक्ती असल्याचं सांगत, डोवालांनी तरुणांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. स्वातंत्र्याचा योग्य वापर, जबाबदारीची जाणीव आणि देशाप्रती असलेली बांधिलकी याच भारताला अधिक सक्षम बनवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ADVERTISEMENT












