ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Jayant Patil, Sangli : सांगलीतील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या कथित प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट भूमिका मांडली. “मंत्रिमंडळात आता कोणतीही रिक्त जागा नाही. आमच्या पक्षातील आमदारांनाही मंत्रिपद देणे शक्य नसताना बाहेरील कोणालाही सामावून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चांना थेट विराम दिला. ईश्वरपूरमध्ये रविवारी संध्याकाळी महात्मा गांधी चौकात महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्थानिक पातळीवर या अफवांमुळे निर्माण झालेली चिंता अनाठायी आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा विषयच नाही, त्यामुळे या चर्चांना काहीच आधार नाही.”
ते पुढे म्हणाले, “निवडणूक काळात आम्ही इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या कामांची व भावी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत आहोत. ईश्वरपूरचे नामांतर करण्याची 172 वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आम्ही पूर्ण केली. आता शहराच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. महायुतीची सत्ता आल्यास निधीअभावी कोणतेही काम अडणार नाही.”
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, ईश्वरपूर शहरातील ‘शास्तीकर’ नगरपालिका निवडणुकीनंतर स्थगित केले जाणार आहे. “शहरासाठी 24 तास शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी 124 कोटींचा तर भुयारी गटार योजनेसाठी 198 कोटींचा निधी मंजूर केला जाईल,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील गाव आणि शहरांची लोकसंख्या जवळपास समान होत चालली असल्याने शहरांना अधिक सुविधा देणे ही सरकारची धोरणात्मक गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी स्वागत केले. नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार विश्वनाथ डांगे यांनी प्रास्ताविक केले. सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अण्णा डांगे, आमदार सत्यजित देशमुख, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सदाभाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शहरातील समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत सभेचा समारोप केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











