NCP: शरद पवारांच्या भेटीनंतर वळसे-पाटलांचं मोठं विधान, म्हणाले… 

मुंबई तक

11 Nov 2023 (अपडेटेड: 11 Nov 2023, 11:34 AM)

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, दिवाळीनिमित्त ही त्यांची कौटुंबीक भेट होती. त्यामुळे या अशा भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil statement about Amit Shah and Ajit Pawar visit Sharad Pawar

Dilip Walse Patil statement about Amit Shah and Ajit Pawar visit Sharad Pawar

follow google news

स्मिता शिंदे, जुन्नर : राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्यांनी गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्यावरुन कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आधी शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) फूट पडली. एकाच पक्षावर दोन गटाकडून दावा केला जाऊ लागला. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघाले. त्यातच आता एका नव्या मुद्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

हे वाचलं का?

अजित पवार यांची पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांना शरद पवार यांच्या अगदी जवळची व्यक्ती समजली होती. मात्र ज्या वेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत वेगळी चूल मांडली त्यावेळी मात्र दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांचा हात सोडून अजित पवारांबरोबर जाणं पसंद केले. त्यामुळे आजही दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण करत ज्यांच्याबरोबर अजित पवारांनी घरोबा केला आहे. त्यांच्याबरोबर जात योग्य पद्धतीने काम चालले आहे असंही त्यांनी सांगितले आहे.

अजित पवार अमित शहांसोबत

दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले की, सध्या युतीतील तिन्हीही पक्ष एकत्र आले आहेत, आणि त्याचबरोबर ते राज्यात एकाच विचाराने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दलही बोलताना सांगितले की, अजित पवारांनी काल दिल्लीत अमित शहांसोबत जी काही भेट झाली आहे अशी चर्चा आहे. त्याबाबत अजून मलाही काही समजलं नाही. मात्र जे काही चालू आहे. ते व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने चालू असून युतीतले तीनही पक्ष एकत्र विचाराने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कौटुंबिक भेटीत राजकीय चर्चा नाही

अमित शहा यांच्या भेटीबद्दल बोलल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याही भेटीबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट ही कौटुंबिक भेट होती आणि कौंटुंबीक पातळीवरचीच चर्चा होती. अशा या कौटुंबिक भेटीत राजकीय चर्चा होत नसल्याचा निर्वाळा देत वळसे-पाटलांनी शरद पवार अजित पवार भेटीवर पडदा टाकण्याचं काम केलं.

अजित पवारांना डेंग्यू

तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आजारी आहेत. त्यावरुनही उलटसुलट जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवारांना डेंग्यू झाला आहे. दिल्लीच्या वातावरणातील प्रदूषण पाहता अजित पवारांनी दिल्ली जाणं टाळायला पाहिजे होतं. या सुप्रिया सुळेंच्या विधानावर वळसे-पाटलांनी समर्थन करत सुप्रिया सुळेंनी काळजीपोटी बोलल्या असल्याचा मत त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा >> ‘तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं, तर माझ्या आयुष्याचं विमान..’, खडसेंचा CM शिंदेंना फोन

नेतृत्व अजित पवारांचे

सरकारमध्ये सहभागी होण्याच्या गोष्टीवरही त्यांनी स्पष्टपणे बोलत त्यांनी सांगितले की, आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच विद्यमान सरकारमध्येच सहभागी झालो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या भेटीनंतर सहकारमंत्री वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे.

शरद पवारांचा आशीर्वाद

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत वेगळी चूल मांडल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनीही त्यांनाच पाठिंबा देत तेही त्यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर आज त्यांनी सांगितले की, शरद पवारांना काल भेटून आम्ही त्यांना दिवाळी शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे ज्यांना जायचं ते जातील असं म्हणत वळसे-पाटलांनी बारामतीतील दिवाळी कार्यक्रमात जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

सर्व समाजाकडून आरक्षणाची मागणी

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आरक्षणावर बोलताना सांगितले की, सध्या सर्व समाज आरक्षणाची मागणी करत आहे. तर बिहार राज्यात आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवून आता त्यांनी 75 टक्के करत विधानसभेत कायदा केला आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही त्या कसोटीवर उतरायला लागणार आहे. त्याच धर्तीवर राज्यात कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता नवीन आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

    follow whatsapp