Datta Dalvi : थेट शिंदेंनाच ललकारलं, कोण आहेत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दत्ता दळवी?

मुंबई तक

• 03:11 PM • 29 Nov 2023

बाळासाहेब ठाकरे यांचा सामान्य कार्यकर्ता ते अगदी मुंबईचा महापौर असा प्रवास करणारे दत्ता दळवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते कधी बैलांच्या झुंजीमुळे चर्चेत येतात तर त्यांच्या तडकाफडकी स्वभावामुळे चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यामुळे.

Former Mayor Datta Dalvi hurled insults at Chief Minister Eknath Shinde at a Shiv Sena event

Former Mayor Datta Dalvi hurled insults at Chief Minister Eknath Shinde at a Shiv Sena event

follow google news

Datta Dalvi: ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ती कट्टर शिवसैनिकांमुळे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाकेला ओ देऊन अनेक शिवसैनिक तयार झाल्यामुळेच कधी काळी लावलेल्या शिवसेना (Shivsena) नावाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. आजच्या काळात शिवसेना हा मोठा राजकीय पक्ष असला तरी शिवसेनेच्या वेगळ्या स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातील एक स्टाईल म्हणजे शिवसेनेची रांगडी आणि शिवराळ भाषा. शिवसेनेच्या या स्टाईलची आज पुन्हा एकदा चर्चा झाली ती दत्ता दळवी यांच्यामुळे. दत्ता दळवी यांनी भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविषयी अपशब्द वापरला आणि त्यांना आज अटक झाली अन् वादाला तोंड फुटले.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीर

आज सकाळी त्यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आणि दत्ता दळवी नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. ते दत्ता दळवी नेमके कोण आहेत. शाखा प्रमुख ते मुंबईचे महापौर असा प्रवास करणाऱ्या दत्ता दळवी यांचा राजकीय प्रवास कसा होता. शिवसेना फुटल्यानंतर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभा राहिले ते राज्यासह देशातील अनेक नेत्यांनी पाहिले आहे.

हिंदूहृदयसम्राट शब्दावरून टीका

कोकणवासियांच्या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली. राजस्थानमध्ये प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं लिहिण्यात आले होते. त्यावरून दत्ता दळवी यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर हा वाद विकोपाला जात त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्यांना अटकही झाली आहे.

साधा शिवसैनिक ते महापौर

ज्या दत्ता दळवी यांना अटक करून 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्या दत्ता दळवींनी आपला राजकीय प्रवासही अगदी सामान्य शिवसैनिकापासून केला आहे. म्हणूनच आजही ईशान्य मुंबईतील राजकारण त्यांच्या नावाशिवाय पुढं जात नाही. कारण विक्रोळी भागातून साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यावेळेपासून त्यांच्या आक्रमक आणि धाडसीपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे.

हे ही वाचा >> Datta Dalvi : मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड

धाडसी आणि आक्रमक

दत्ता दळवी यांनी शिवसेनेसाठी काम करत असताना आपल्या कामाच्या धडाक्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. जनसामान्यांची कामं असोत की शिवसैनिकांची. त्यांची कामं करण्यासाठी त्यांनी तेवढ्याच धाडसीपणाने आणि आक्रमकपणाने लावून धरली. त्यामुळेच त्यांच्या कामाची दखल मातोश्रीला घ्यावी लागली. त्यांच्यी कामाची दखल घेतल्यामुळे त्यांनी साधा शिवसैनिक ते मुंबईचा महापौर असा प्रवास केला.

तडकाफडकी स्वभाव

दत्ता दळवी म्हणजे शाखाप्रमुख ते मुंबईचा महापौर अशी ओळख असली तरी त्यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुख पदासह उपनेते पदही त्यांनी तेवढ्याच समर्थपणे सांभाळले आहे. त्यांनी अनेक पदं सांभाळली असली त्यांच्या तडकाफडकी स्वभावामुळेही ते चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना तोटाही तेवढाच सहन करावा लागला होता.

चर्चा वादाची

आज दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांना अटक करून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. याआधीही ते एकदा नव्या वादामुळे चर्चेत आले होते. 2022 मध्ये कोकणाताली एका बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्यामुळे कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. कारण त्या झुंजीच्या आयोजनात एका बैलाचा मृत्यू होऊन काही बैल गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे शिवसैनिकांसह त्यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली होती.

कार्यकर्त्यांची मोठी फळी

दत्ता दळवी यांच्या नावाशिवाय ईशान्य मुंबईतील राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. कारण दत्ता दळवी ही त्या ठिकाणी मोठी ताकद समजली जाते. त्या भागात अगदी सामान्य शिवसैनिक ते महापौर पदापर्यंत त्यांनी आपला राजकीय प्रवास केला आहे. महापौर असतानाही त्यांनी शिवसैनिकांची या भागात मोठी फळी निर्माण केली. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेसाठी लढावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांना विधानसभेला निवडून आणण्यातही त्यांचा मोठा हात आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत दत्ता दळवी या नावाशिवाय तेथील राजकारण पूर्ण होऊ शकत नाही.

    follow whatsapp