Sahar Shaikh old Facebook Post about Jitendra Awhad : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरला. या प्रभागातून AIMIM कडून निवडणूक लढवणाऱ्या सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. विशेष म्हणजे, या विजयासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत केलेलं भाषण चांगलंच गाजलं. या भाषणामुळे सहर शेख या नावाची राज्यभर चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आता सहर शेख यांची एक जुनी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टची 'मुंबई Tak' पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
या व्हायरल पोस्टमध्ये सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख “माझे मेंटॉर, माझे शिक्षक” असा केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट समोर आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सहर शेख यांनी निवडणुकीनंतरच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका केली असताना, दुसरीकडे याच आव्हाडांसाठी केलेली ही भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही नेटकरी जितेंद्र आव्हाडांमुळेच सहर इथवर पोहोचली, असा दावा करत आहेत.
सहर शेखने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे मार्गदर्शक, माझे शिक्षक. कामाप्रती तुमची निष्ठा मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करण्यास प्रेरित करते. अल्लाह तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि भरपूर यश देवो,” असा मजकूर सहर शेख यांनी त्यांच्या जुन्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. सध्या ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 30 मध्ये AIMIM ला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या प्रभागातून AIMIM चे नफिस अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरिक असे चार उमेदवार विजयी झाले. संपूर्ण प्रभागाने AIMIM ला पसंती दिल्यामुळे मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. ठाणे महानगरपालिकेत AIMIM चे एकूण पाच उमेदवार विजयी झाले असून, मुंब्र्यात पक्षाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे.
विजयानंतरचं गाजलेलं भाषण
विजयानंतर झालेल्या सभेत सहर शेख यांनी केलेलं भाषण विशेष चर्चेत राहिलं. त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचत, “आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असा घणाघाती हल्ला चढवला. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असंही म्हटलं होतं.
राजकीय वारसा, वाद आणि स्पष्टीकरण
सहर शेख या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. उमेदवारी नाकारल्यामुळे आणि शब्द फिरवल्यामुळे हा संघर्ष उफाळून आल्याचं सहर शेख यांनी सांगितलं आहे. ‘मुंब्रा हिरवा करू’ या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत, हा पक्षाचा रंग असून कोणत्याही धर्माशी जोडलेला नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनीही सहर शेख यांचं कौतुक करत, “ती तरुण, उच्चशिक्षित आणि प्रभावी वक्त्या असून मजलिसचा मुंबईतील चेहरा ठरू शकते,” असं मत व्यक्त केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











