‘मोदी युगात हिंदुत्व कमालीचे…’, भाजपला सुनावलं, शिवसेना (UBT) का भडकली?

मुंबई तक

22 Jun 2023 (अपडेटेड: 22 Jun 2023, 03:22 AM)

हरयाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष धनखड यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतना शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत.

Shiv sena of uddhav Thackeray slams pm narendra modi over situation of country

Shiv sena of uddhav Thackeray slams pm narendra modi over situation of country

follow google news

“मोदी युगात अशा बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण अशा विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपच्या राजवटीत बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचं पीक आल्याचे म्हटले आहे. हरयाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष धनखड यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतना शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे.”

हेही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…

“भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. ज्या देशाचे पंतप्रधान गटाराच्या नाल्यातून ‘गॅस’ निर्माण करण्याची भाषा करतात व अंधभक्त माना डोलावतात, त्या देशाने आधुनिकतेची कास सोडून पुन्हा बाबा आदमच्या जमान्याचा मार्ग निवडलेला दिसतो”, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने लगावला आहे.

“जर महिलांची उंची वाढली असेल तर मग गगनाला भिडलेल्या महागाईची, बेरोजगारीची उंची का कमी होऊ नये? मणिपुरात हिंसाचाराची आग भडकली आहे. त्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारने का गाठू नये? मोदी युगात भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने टोकाची उंची गाठली”, असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

सावरकरांचा वापर स्वार्थासाठी

“कोविडवरील लस पंतप्रधान मोदी यांनी शोधून काढली असे भाजपचे नेते सांगतात व अंधभक्त त्यावर टाळ्या वाजवतात. हा त्यांचा नवीन धर्म. त्यात संशोधक, विज्ञानास स्थान दिसत नाही. गाय ही माता नसून एक उपयुक्त पशू आहे हा वीर सावरकरांचा विचार. मोदी युगात वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत, पण त्यांना वीर सावरकरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करायचा आहे”, असं म्हणत सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.

हेही वाचा >> Ajit Pawar: ‘दादांनी माझे महिने मोजलेत..’, जयंत पाटलांनी ‘असा’ काढला अजितदादांना चिमटा!

“हिंदू धर्म हा संकुचित नाही, पण मोदी युगात हिंदुत्व कमालीचे संकुचित व भयग्रस्त झाल्याचे दिसत आहे. खरं तर हिंदू धर्म हा एकमेव धर्म असा आहे की, जो विज्ञानाशी सुसंगत दिसतो. हिंदू धर्म हा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मवाद यांचा मिलाफ आहे. धर्म आणि धर्मांधता यात फरक केला पाहिजे. हिंदुत्व हे आता धर्मांधता व बुरसटलेल्या विचारांकडे ढकलले जात असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे”, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

नेहरूंचा उल्लेख करत मोदींना टोला

“कोविडची ‘लस’ मोदींनी बनवली, हरयाणातील मुलींची उंची मोदी सत्तेत आल्यामुळे वाढली अशा प्रकारचे ‘बोल’ हे मेंदूचा ताबा अंधश्रद्धा व अंधभक्तीने घेतल्याचा परिणाम आहे. देशातील सर्व प्रमुख संशोधन, वैज्ञानिक, तांत्रिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबा घेतला व या संस्थांच्या मोक्याच्या जागी संघ विचारांची माणसे बसवली. जेव्हा विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते व वेगळ्या प्रकारची फॅसिस्ट राजवट सुरू होते. मोदींमुळे मुलींची उंची वाढली हा विचार त्याच राजवटीतून निर्माण झाला. नेहरूंनी देशाला विज्ञान व संशोधनात उंच नेऊन ठेवले. त्या उंचीवरून देश खाली घसरताना दिसत आहे”, असं भाष्य शिवसेनेने केले आहे.

    follow whatsapp