Who is Kainat Dhar : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळे यांची लगीनगाठ बांधली. सारंग लखानी हे ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असून ते क्रीडाप्रेमी आणि उत्तम बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले जातात. या विवाहसोहळ्याला राजकीय, सामाजिक, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या सोहळ्यात एका व्यक्तीची विशेष चर्चा रंगली आणि ती म्हणजे कायनात धार.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, छत्री विसरु नका! पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह...
रेवती सुळे यांच्या लग्नात कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासह प्रवेश केल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात कायनात धार यांच्याबाबत चर्चा सुरू झाली. लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्यामुळे कायनात धार नेमक्या कोण आहेत, त्यांचा पवार कुटुंबाशी काय संबंध आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली. याआधीही त्यांचे नाव विविध कारणांनी चर्चेत आलेले आहे.
कोण आहेत कायनात धार?
कायनात धार या मूळच्या काश्मीरच्या असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. पवार कुटुंबाशी त्यांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. गेल्या काही काळात त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा दिसून आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन आणि पूजा करताना दिसले होते. त्यावेळी मंदिर परिसरातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतरही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आली आहे.
कायनात धार या केवळ आनंदाच्या प्रसंगांमध्येच नव्हे, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत दिसल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामतीत पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तसेच मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्याला राहुल गांधी, अखिलेश यादव, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, ओमर अब्दुल्ला, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनीही हजेरी लावली. तसेच उद्योगक्षेत्रातील मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि गौतम अदानी हेही सहकुटुंब विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT











