ठाणे: निवडणूक लागली की दोन गोष्टी हमखास दिसतात, एक शिंदेंचं दिल्लीला जाणं आणि शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात भाजपने पंगा घेणं. आताही तेच सुरू आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीसाठीही ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप सामना सुरू आहे. पण अशी कोणती ती भळभळती जखम भाजपच्या मनात आहे की ज्यावरून आजही निवडणुका लागल्या की भाजप ठाण्यात दावा करायला सुरूवात करते. याचविषयी समजून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT
आताचा ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि 2009 पूर्वीचा ठाणे लोकसभा मतदारसंघ वेगळा होता. 2009 पूर्वी ठाणे हा देशातील दुसरा मोठा लोकसभेचा मतदारसंघ होता. ठाणे जिल्ह्यातलाच कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ आधी ठाण्याचाच भाग होता. 1962 मध्ये अस्तित्वात आलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर पहिले काँग्रेसचे सोनुभाऊ बसवंत निवडून गेले. त्यानंतर मात्र इथे जनता पार्टी-भाजपचा वरचष्मा होता. रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंसारख्या अभ्यासू नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं.
मात्र 1996 च्या लोकसभा निवडणुकीत आनंद दिघेंनी ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा दावा ठोकला. मराठीच्या मुद्द्यानंतर हिंदुत्वाकडे आपली कूस बदललेल्या शिवसेनेची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढतेय, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपपेक्षा सेनेचे नगरसेवक जास्त असल्याने या जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे या जोरावर ठाणे मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असेल अशी भूमिका शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघेंनी घेतली.
आनंद दिघेंची हीच मागणी बाळासाहेबांनीही पुढे लावून धरली आणि युतीच्या जागावाटपात ठाण्यात विद्यमान खासदार भाजपचे असूनही युती टिकवण्यासाठी प्रमोद महाजनांनी ठाण्याच्या जागेवर पाणी सोडलं. जागा शिवसेनेकडे गेल्याने भाजपने राम कापसेंना राज्यसभेवर पाठवलं. त्याही वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं आताचे भाजपचे नेते सांगतात. राम कापसेंसारखा नेता, नगरसेवक-आमदारकी ते खासदारकीपर्यंत प्रवास केलेल्या नेत्याची सिटिंग सीट सेनेला सोडावी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती.
ADVERTISEMENT










