Virat Kohli Test Captaincy: मुंबई: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही शनिवारी (15 जानेवारी) कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत आता संघाचा पुढचा कर्णधार कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे कसोटी संघाची कमान सोपवली जाऊ शकते, असे दिग्गज आणि चाहत्यांना वाटते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या मूडमध्ये दिसत नाही. त्याच्या मनात दुसरंच एखादं नाव आहे.
ADVERTISEMENT
वास्तविक, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोहलीने टी-20 फॉर्मेटमधून राजीनामा दिला होता. यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपदही काढून घेतले होते. या निर्णयानंतर भारतीय बोर्डाने टी-20 आणि वनडे संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवलं होतं.
अशा परिस्थितीत रोहितकडेच कसोटी संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते, असे चाहत्यांना वाटणेही स्वाभाविक आहे, कारण कोहलीनंतर रोहित हा एकमेव वरिष्ठ खेळाडू आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, असे दिसत नाही.
निवडकर्ते काय विचार करत आहेत?
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, निवडकर्त्यांना कसोटी संघाच्या कर्णधारपदावर नव्याने चर्चा करायची आहे. कर्णधारपदासाठी ज्या नावांची चर्चा होणार आहे त्यात केएल राहुलचेही नाव आहे. जर आपण एखाद्या प्रक्रियेबद्दल बोललो, तर उपकर्णधाराने संघाचं नेतृत्व सांभाळलं पाहिजे. परंतु निवडकर्त्यांना सर्व फॉरमॅटचे (कसोटी, एकदिवसीय, टी-20) कर्णधारपद एकाकडे द्यायचे की, कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार असावेत यावर चर्चा करायची आहे.
काय असू शकते बीसीसीआयचे गणित?
जर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार बनवण्याचा निर्णय झाला, तर रोहितकडे कसोटीचं नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला जाईल. पण कसोटी आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार करण्याचं निवडकर्त्यांनी ठरवलं तर केएल राहुलचे नाव कसोटीत आघाडीवर असू शकते. याचे कारण म्हणजे केएल राहुल संघाचा उपकर्णधारही असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणे या स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. जर केएल राहुल कर्णधार झाला तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधार होऊ शकतो.
विराटने टेस्टचं कर्णधार पद सोडल्यानंतर जय शाह, राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया म्हणाले….
टीम इंडियाची पुढची कसोटी मालिका श्रीलंकेसोबत
भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्धची आगामी कसोटी मालिका त्यांच्याच मायदेशातच खेळायची आहे. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 फेब्रुवारीपासून बंगळुरूमध्ये आणि दुसरा कसोटी सामना 5 मार्चपासून मोहालीत होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे.
सध्या भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 जानेवारीला होणार आहे. या एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलच संघाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT