एकीकडे ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदकांच्या शर्यतीत आगेकूच करत असताना दुसरीकडे इंग्लंडमध्ये भारतीय संघाच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर पहिल्याच दिवशी भारतीय बॉलर्सनी इंग्लंडच्या फलंदाजांना आपला दणका दिला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत आटोपला.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा इंग्लंडचा निर्णय पूरता फसला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच प्रयत्नात इंग्लंडचा ओपनर रोरी बर्न्सला आऊट करत इंग्लंडला धक्का दिला. यानंतर मधल्या फळीत इंग्लंडचे काही फलंदाज आणि अखेरच्या फळीत सॅम करनचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली. भारतीय बॉलर्सनी मोक्याच्या क्षणी इंग्लंडची जमलेली जोडी फोडत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं.
इंग्लंडकडून कॅप्टन जो रुटने भारतीय बॉलर्सचा सामना करत एकाकी झुंज दिली. त्याने १०८ बॉलमध्ये ११ फोर लगावत ६४ रन्स केल्या. या इनिंगदरम्यान अनेक विक्रमांची नोंद झाली. इंग्लंडचे ४ बॅट्समन शून्यावर आऊट झाले. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर येणाऱ्या डॅन लॉरेन्स आणि जोस बटलर यांना लागोपाठ शून्यावर पाठवण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं.
ठराविक अंतराने भारतीय बॉलर्स आज इंग्लंडच्या फलंदाजांची भागीदारी मोडण्यात यशस्वी झाले. त्याआधी संघनिवड करताना विराट कोहलीने अनुभवी रविचंद्रन आश्विन आणि इशांत शर्माला विश्रांती देत शार्दुल आणि सिराज यांना स्थान दिलं. ज्यावरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रीया येत होत्या. परंतू भारतीय बॉलर्सनी आज बहारदार कामगिरी करत स्वतःची निवड सिद्ध करुन दाखवली आहे.
ADVERTISEMENT











