आयपीएलच्या चौदाव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अद्याप म्हणावा तसा सूर सापडलेला दिसत नाही. लोकेश राहुलच्या पंजाब किंग्ज संघाने आपली पराभवाची मालिका खंडीत करुन गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. १३२ रन्सचं टार्गेट पंजाब किंग्जने कॅप्टन लोकेश राहुल आणि ख्रिस गेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून पंजाबचा कॅप्टन राहुलने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॉलर्सनी आपल्या कॅप्टनने घेतलेला निर्णय योग्य ठरवत मुंबईच्या बॅट्समनवर सुरुवातीपासून अंकुश मिळवला. क्विंटन डी-कॉक आजच्या मॅचमध्येही अपयशी ठरला. एकीकडे चेन्नईचं स्लो पिच बॉलर्सना मदत करत असताना, मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने संयमी खेळ केला. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने चौथ्या विकेटसाठी पार्टनरशीप करुन मुंबईचा डाव सावरला.
परंतू मोक्याच्या ओव्हर्समध्ये चेन्नईच्या पिचवर फटकेबाजी करणं मुंबईच्या बॅट्समनला जमलं नाही. सूर्यकुमार यादव माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने आपलं या हंगामातलं पहिलं अर्धशतक झळकावलं. रोहितने ५२ बॉलमध्ये ५ फोर आणि २ सिक्स लगावत ६३ रन्सची इनिंग खेळली. यानंतर मुंबई इंडियन्सची मधली फळी अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकलं नाही. पंजाबकडून शमी-बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ तर दीपक हुडा आणि अर्शदीप सिंग यांनी १-१ विकेट घेतली.
IPL 2021 : जोफ्रा आर्चरची यंदाच्या हंगामातून माघार, राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढल्या
प्रत्युत्तरादाखल पंजाबने धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मयांक अग्रवाल राहुल चहरच्या बॉलिंगवर आऊट झाल्यानंतर मुंबईला आशेचा किरण दिसला होता. पण यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत मुंबईच्या आशांवर पाणी फिरवलं. पंजाबकडून लोकेश राहुलने नाबाद ६० तर गेलने ४३ रन्सची इनिंग खेळली. मुंबईच्या बॉलर्ससोबत फिल्डर्सनेही आज निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ काय रणनिती आखून मैदानात उतरतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT












