दुबई: भारतीय संघाला टी-20 विश्वचषक 2021 च्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी पाकिस्तानने टीम इंडियावर 10 गडी राखून विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. हा पराभव संपूर्ण भारतीय संघाच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, असं असलं तरीही भारतीय संघाने या क्षणी आपली खिलाडूवृत्ती कायम ठेवल्याचं पाहायला मिळाली.
ADVERTISEMENT
हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB)एक फोटो शेअर करून कर्णधार विराट कोहलीची देखील स्तुती केली आहे.
‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’, पीसीबीनेही शेअर केला विराटचा फोटो
भारत वि. पाकिस्तान सामना संपल्यानंतरचा एक व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली विरोधी कर्णधार बाबर आझम आणि रिजवानचे अभिनंदन करताना दिसत आहे. तसेच, भारतीय कर्णधाराने मोहम्मद रिझवानला हसत मिठी देखील मारली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहलीने 49 चेंडूत 57 धावांची चांगली खेळी केली. त्याच्याशिवाय रिषभ पंतने 39 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले. हसन अली यांना दोन, तर हरिस रौफ आणि शादाब खान यांना दोन यश मिळाले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने 17.5 षटकांत बिनबाद 152 धावा करत सामना जिंकला. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने 79 आणि कर्णधार बाबर आझमने 68 धावांची नाबाद खेळी केली. संपूर्ण डावादरम्यान भारतीय संघाचे गोलंदाज विकेट घेण्याची तळमळ करत होते. मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांची जोडी चांगलीच महागात पडली.
पाकिस्तानचे स्वप्न अखेर पूर्ण झाले
विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तान संघाचा हा ऐतिहासिक विजय होता. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 50 आणि 20 षटकांच्या विश्वचषकासह एकूण 12 सामने झाले होते. या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजयाची पताका फडकवली होती. यादरम्यान, भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकातील सर्व 7 सामने आणि टी-20 विश्वचषकातील पाचही सामने जिंकले होते.
ADVERTISEMENT