SA vs IND : सामना रंगतदार अवस्थेत, आफ्रिकेचं दमदार पुनरागमन; भारताला विजयासाठी करावे लागणार प्रयत्न

मुंबई तक

• 04:15 PM • 05 Jan 2022

सेंच्युरिअन कसोटी सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने दोन गडी गमावत ११८ धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेला अजून १२२ धावांची गरज असून कर्णधार डीन एल्गर मैदानात अजुनही टिकून असल्यामुळे आफ्रिकेच्या विजयासाठीच्या आशा अजुनही पल्लवित […]

Mumbaitak
follow google news

सेंच्युरिअन कसोटी सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने दोन गडी गमावत ११८ धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेला अजून १२२ धावांची गरज असून कर्णधार डीन एल्गर मैदानात अजुनही टिकून असल्यामुळे आफ्रिकेच्या विजयासाठीच्या आशा अजुनही पल्लवित आहेत.

हे वाचलं का?

दुसऱ्या बाजूला भारताला या सामन्यात विजयासाठी प्रयत्न करावे लागणा आहेत. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात धावगतीवर अंकुश ठेवण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळालं नाही. डीन एल्गर आणि एडन मार्क्रम जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या डावात सात विकेट घेणाऱ्या शार्दुल ठाकूरने मार्क्रमला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर आलेल्या केगन पिटरसननेही आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.

दोन्ही फलंदाजांनी मैदानावर तळ ठोकून काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ४६ धावांची भागीदारी झाल्यानंतर आश्विनने पिटरसनला आऊट करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. परंतू यानंतरही कर्णधार एल्गरने व्हॅन डर डसेनच्या साथीने पडझड रोखत आपल्या संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. त्यामुळे तिसऱ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेच्या संघाने आपलं पारडं जड ठेवण्यात यश मिळवलं आहे.

त्याआधी, दुसऱ्या डावात भारताने २६६ धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं. फलंदाजीसाठी खडतर असलेल्या जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर भारताकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर अखेरच्या फळीत हनुमा विहारी आणि शार्दुल ठाकूरने केलेली फटकेबाजी ही महत्वाची ठरली.

    follow whatsapp