MS Dhoni instagram post : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या आयसीसी मेन्स टी 20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मैदानातील जल्लोषासोबतच सोशल मीडियावर टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी याने शेअर केलेली एक पोस्ट सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. एम.एस धोनी सोशल मीडियावर अत्यंत कमी सक्रिय असतो, मात्र अनेक महिन्यांनंतर त्याने केलेल्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ADVERTISEMENT
या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान धोनी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये रोहित शर्मा आणि जय शाह यांच्यासोबत उपस्थित होता. भारताच्या विजयानंतर धोनीने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यामध्ये त्याने विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे कौतुक केले आहे. धोनीने आपल्या पोस्टमध्ये गंभीर यांचा उल्लेख 'कोच साहब' असा करत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचे कौतुक केले. गंभीर हे सहसा त्यांच्या कडक स्वभावासाठी आणि गंभीर प्रतिमेसाठी ओळखले जातात, त्यामुळेच धोनीने "कोच साहब, तुमच्या चेहऱ्यावर हे हास्य खूप छान दिसते" असे लिहित सर्वांचे लक्ष वेधले. अहमदाबादमध्ये इतिहास घडला असून हा विजय संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्याने नमूद केले.
हेही वाचा : पुण्यातील वारजेत पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध, विवाहितेचा वेगळ्या गोळ्या देऊन गर्भपात
धोनी आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंधांबाबत सोशल मीडियावर अनेकदा विविध चर्चा आणि अफवा पसरवल्या जातात, मात्र धोनीच्या या एका पोस्टने अशा सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासोबतच धोनीने भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही आपल्या खास शैलीत कौतुक केले. बुमराहबद्दल काही न लिहिलेलेच बरे कारण तो एक चॅम्पियन गोलंदाज आहे, अशा शब्दांत त्याने बुमराहच्या कामगिरीला दाद दिली. अंतिम सामन्यात बुमराहने घातक गोलंदाजी करत केवळ 15 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी 256 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांच्या दबावाखाली राहिला. किवी संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, परंतु 19 व्या षटकात 159 धावांवर त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला. या विजयासह भारताने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला असून धोनीच्या पोस्टमुळे या विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मनसेच्या वर्धापनदिनी रायगडावरुन नवी सुरुवात, सोशल मीडिया पोस्ट करत राज ठाकरेंची मोठी घोषणा
ADVERTISEMENT











