राज्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; 86 नव्या रुग्णांची नोंद, पुणे-मुंबईत सर्वाधिक प्रादुर्भाव
जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 16,226 कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 1,362 नमुने पॉझिटिव्ह आढळले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत 28, पिंपरी-चिंचवडमध्ये 7, ठाण्यात 6 आढळले

जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 16,226 कोविड-19 चाचण्या

आरोग्य विभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Covid19 Cases in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. शनिवारी राज्यात 86 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, सध्या राज्यात एकूण 595 सक्रिय रुग्ण आहेत. याचवेळी, 749 रुग्णांनी कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन रिकव्हरी नोंदवली आहे.
2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात एकूण 1,362 रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात सर्वाधिक 31 रुग्ण आढळले, तर ग्रामीण पुण्यात 2 रुग्ण नोंदवले गेले.
हे ही वाचा >> मिठी नदी सफाई घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरियाला समन्स, प्रकरण काय? अभिनेता कसा अडकला?
मुंबईत 28, पिंपरी-चिंचवडमध्ये 7, ठाण्यात 6, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4, नागपूरमध्ये 3, मीरा-भाईंदरमध्ये 2, तसेच सातारा, कोल्हापूर आणि सांगली येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यावरून राज्याच्या विविध भागांमध्ये संसर्गाचा फैलाव कायम असल्याचे स्पष्ट होते.
जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 16,226 कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 1,362 नमुने पॉझिटिव्ह आढळले. मुंबईत यंदा आतापर्यंत 640 रुग्ण नोंदवले गेले, त्यापैकी 634 रुग्ण एकट्या मे महिन्यात आढळले. त्यामुळे संसर्ग वेगानं वाढत असल्याचं दिसून येतंय.
हे ही वाचा >> बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?
शुक्रवार ते शनिवार या कालावधीत कोणत्याही नव्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यंदा राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 17 रुग्णांना आधीपासूनच इतर गंभीर आजार होते.
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल आणि सणासुदीच्या काळात लोकांची वाढती वर्दळ यामुळे संसर्गाची प्रकरणं पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्सचा नियम पाळणे आणि लसीकरण पूर्ण करणे यासारख्या खबरदारीच्या उपायांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.